शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौकाजवळ एका मालमोटारीची पाठीमागून दुचाकीला धडक बसून असद अल्ताफ बागवान (वय ३, रा. कर्जाळ, ता. अक्कलकोट) या चिमुकल्या मुलाचा आजी-आजोबांच्या डोळ्यांदेखत जीव गेला. असद हा आजी-आजोबांसोबत दुचाकीवर बसून कर्जाळ येथून सोलापूरकडे आला होता. शांती चौकाजवळ वळण घेऊन पुढे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका मालमोटारीने ठोकरले. यात कोवळा असद आणि त्याची आजी मुमताज सरदार बागवान (वय ४५) हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात मालमोटारीचे पाठीमागील चाक छोट्या असदच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो जागीच मृत झाला. तर आजी मुमताज गंभीर जखमी झाली. या जड वाहतुकीने बळी घेतलेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करीत, पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
गेल्या २२ जानेवारी रोजी जुना पुणे नाका येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ एका डंपरने जोरात धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात आई आणि बहिणीच्या डोळ्यांसमोर श्रीपाद पवन कवडे (रा. हुतात्मा शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूर) या बालकाचा बळी गेला होता. आई आणि बहिणीसोबत दुचाकीवर बसून बाळे येथून घराकडे परत येत असताना जड वाहतुकीने श्रीपादचा जागीच बळी घेतला होता. या दुर्घटनेमुळे त्याच्या पालकांसह कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.
गेल्या महिन्यापूर्वी हैदराबाद रस्त्यावर बाह्यवळणाजवळ देवदर्शनासाठी रिक्षात बसून निघालेल्या एका कुटुंबातील पाचजणांना पाठीमागून मालमोटारीने जोरात ठोकले आणि क्षणार्धात पाच जीवांचा बळी गेला होता.एकीकडे जड वाहतुकीचे प्रस्थ वाढले असताना दुसरीकडे विशेषतः अपघातप्रवण भागातील बहुतांशी रस्ते अक्षरशः खड्डेमय आहेत. त्याकडे पोलीस आणि महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे जड वाहतूक आणि खड्डेमय रस्ते ही सोलापूरकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.