देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदोत व हे स्वातंत्र्य असेच तेवत राहो अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

“काही लोक म्हणत असतील ७५ वर्षात काहीच घडलं नाही. परंतु ७५ वर्षात केलेलं काम आपल्या स्मरणात राहिले पाहिजे. त्याच दिशेने व आपल्या पूर्वजांनी जे काम केलेय त्याच पध्दतीने येत्या काळात काम करायचे आहे,” असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केले.

“स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करतानाच करोना संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. दीड वर्षात सर्व कर्मचारी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी आपत्तीवर मात करण्याचे काम केले. त्यातून परिस्थिती बदलली आहे. पुढचा स्वातंत्र्य दिन आपल्याला यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल,” अशी अपेक्षा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. या ७५ वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपल्या देशातील लोकांनी काम केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.