“जगातील वाघांच्या एकूण संख्येच्या तुलनेत भारतात ७५ टक्के वाघ आहेत. त्यादृष्टीने भारत मोठी शक्ती आहे, असे केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पाच सार्वजनिक उपक्रम घेऊन समोर जात आहेत. विकास, विज्ञान, स्थानिकांचा सहभाग, व्याघ्र सुरक्षा, आदिवासींचे संरक्षण, अनुकूल वातावरण निर्मिती, जलवायू वाढविण्यासाठी उपाययोजना, जैवविविधता संरक्षण तसेच स्थानिकांना घेऊन वन व पर्यावरण रक्षणावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.” तसेच येत्या काळात वन्यजीवांचे कार्यक्रम प्रत्यक्ष फिल्डवर घेण्याची सूचना यादव यांनी केली.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण तसेच पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे जागतिक व्याघ्र दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ‘एनटीसीए’चे डॉ. एस.पी.यादव, वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.

विशेष व्याघ्र संरक्षण दलाची परेड व सलामीने कार्यक्रमाची सुरूवात –

कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाची परेड व सलामीने झाली. याप्रसंगी यादव यांनी व्याघ्र संरक्षण व संवर्धनासाठी देशात मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याची माहिती दिली. वाघांचे ५२ प्रकल्प सोबतच ३२ हत्ती प्रकल्प आहेत. जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत, ५२ टायगर प्रोजेक्ट, १७ प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. वाघ, हत्ती, सिंह यांच्या सर्क्षणासाठी काम केले जात आहे. १९५२ नंतर भारतात चीता नव्हता. मात्र, आता लवकरच चीता भारतात येणार आहे, असे ते म्हणाले.

पर्यावरण आणि विकास एकमेकांविरुद्ध नाही. नवीन संशोधन, संकल्पना आदींना घेऊन जंगलाचे संरक्षण करायचे आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, जेवविविधता कायदा या दोन कायद्यावर लोकसभेत चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आदिवासींन शिवाय जंगलाचे संरक्षण शक्य नाही. आदिवासींचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वन विभाग काम करत आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या १७ टक्के आहे व कार्बन उत्सर्जन ४ टक्के आहे. इतर देशाची लोकसंख्या एवढी असली तरी कार्बन उत्सर्जन ६० टक्के आहे. तेव्हा यावर काम करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

जगात वाघांच्या ३ प्रजाती नष्ट झाल्या –

केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी वाघांचे महत्व निदर्शनास आणून दिले. जगात वाघांच्या एकूण ९ प्रजाती आहे. त्यातील ३ प्रजाती नष्ट झाल्या. ६ प्रजाती १३ देशात शिल्लक आहेत. भारतात २०१८ मध्ये वाघांची संख्या २९६७ इतकी होती. २०२२ मध्ये ती वाढली आहे. वन, वन्यजीव यांचे जतन करा. असेही ते म्हणाले.

वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार –

प्रास्ताविक भाषणात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डॉ.एस.पी.यादव यांनी वाघाचे महत्व विषद करतांना वन अधिकारी व कर्मचारी यांच्रूा कार्याचे कौतूक केले. यावेळी व्याघ्र संरक्षण करतांना ताडोबात मृत्युमुखी पडलेल्या स्वाती ठुमने यांना केंद्रीय मंत्र्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी जंगलात तथा व्याघ्र संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या देशातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार अमित मलिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची २१ वी बैठक, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ६९ वी सभा तसेच मंत्री महोदयांसोबत देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालकांसोबत चर्चा केली.