कराड: जम्मू काश्मिरातील पहलगाम हल्ल्याचा वचपा म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अचूक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्रे डागून नऊ दहशतवादी तळ उध्दवस्त केले. याचा आनंदोत्सव म्हणून येथील शिवतीर्थावर सामाजिक संघटना, संस्था व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, पेढे वाटून एकच जल्लोष केला.
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जला दो जला दो पाकिस्तान जला दो’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानमधील पाच आणि पाकव्याप्त काश्मिरातील चार दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. हवाई हल्यातून दहशतवाद्यांचे हे नऊ तळ पद्धतशीरपणे उध्दवस्त केल्याच्या सुवार्तेचे मंगलप्रभात समयापासून जोरदार स्वागत झाले. देशभरात दिवसभर जल्लोष साजरा केला जात असताना कराडच्या शिवतीर्थावर सामाजिक संघटना, विविध संस्था, विविध समाज माध्यम समूह (सोशल मिडीया ग्रुप) व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, पेढे वाटून एकच जल्लोष साजरा केला.
भारताने पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घेत अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याचे उपस्थितांनी जोरदार समर्थन केले. हल्लेखोर दहशतवाद्यांचा पूर्ण बिमोड करण्याच्या आणि वेळप्रसंगी प्रत्यक्ष पाकिस्तानशी युध्द पुकारल्यास केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत संपूर्ण देशवासीय ठाम राहतील तसेच आवश्यक ते सर्व योगदान देतील अशा भावना सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी या वेळी व्यक्त केल्या.
शिवतीर्थावरील या आनंदोत्सवात रणजितनाना पाटील, प्रमोद पाटील, समाधान चव्हाण, सागर आमले, संग्राम चव्हाण, दिनेश पोरवाल आदी सहभागी झाले होते. दरम्यान, प्रशासन व पोलीस सतर्क दिसत आहे.
फोटो ओळी: पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचा कराडच्या शिवतीर्थावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.