राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली असून, त्यास भाजपाने पाठिंबा दिल्याने राज्यात वातावरण तापले आहे. सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने मनसे आक्रमक झाली कायम आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्यासह देशभरातील परिस्थितीबाबत शरद पवार यांनी भाष्य केले.

“देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव  टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

 “कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार आहे. पण लोकांना बोलावणे आणि आपापसातील संबंध संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही. असे काम काही राजकीय नेते करत आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली.

“मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे. गेली दोन वर्षे जगात करोनाचे सावट आले होते. त्यामुळे उत्सव साजरा करायला मिळाला नाही. लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज करोना समस्या कमी झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला आहे,” असेही शरद पवार म्हणाले. शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जातोय त्याबद्दल शरद पवार यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

“काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी,” असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी, “देशात आज जे वातावरण आहे, जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. ‘हम सब एक है’ हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी,” असे आवाहन केले.