आयएनएस विक्रांत जहाजासंदर्भात झालेल्या ५७ कोटींच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन शिवसेनेनं भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याबरोबरच त्यांची पाठराखण करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याची माहिती राजभवनामधून पुढे आल्याने आता राजभवनाच्या मागेही ईडी लावणार का असा खोचक प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय. त्याचप्रमाणे विक्रांतच्या नावे पैसे गोळा करुन भ्रष्टाचार करणाऱ्या सोमय्या पिता-पुत्रांचे जोड्यांनी स्वागत करायला हवं, असा टोलाही शिवसेनेनं लगावलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: “…तर महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल”; मोदींसोबतच्या भेटीनंतरच शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

तेव्हा राज्य सरकार आणि केंद्राने हात झटकले
“भ्रष्टाचाराच्या बाबतीत नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे नाक आय.एन.एस. विक्रांत प्रकरणात साफ कापले आहे. अण्णा हजारे व देशातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणारे कोणी उरले असतील तर त्यांनी भाजपाच्या भ्रष्टाचाराची ही ‘विक्रांत फाईल’ तपासायला हवी. बांगलादेश युद्धात भारताला विजय मिळवून देणऱ्या ‘विक्रांत’ युद्धनौकेचेही भाजपाचे ‘महात्मा’ किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील यांनी कसे शोषण केले याचे सत्य उसळून बाहेर आले आहे. विक्रांत युद्धनौका भारताच्या नौदलातून निवृत्त व्हायची वेळ आली तेव्हा फक्त सैन्यदलच नव्हे, तर संपूर्ण देश हळहळला. याच युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात कराची, चितगाव बंदरांची राख केली. पाकिस्तानच्या आरमाराला समुद्राचा तळ गाठायला लावला. अशी युद्धनौका भंगारात न काढता त्याचे कायमचे युद्ध स्मारक व्हावे व पुढच्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळावी, अशी भूमिका निर्माण झाली, पण ‘विक्रांत’ वाचविण्यासाठी लागणाऱ्या दोनेकशे कोटींचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा राज्य सरकार आणि केंद्राने हात झटकले. केंद्रात यूपीएचे आणि महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीचे राज्य तेव्हा होते,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

लफंगेगिरी समोर आली
“या दोन्ही सरकारांत राष्ट्रभावना नाही वगैरे आरोप करीत ‘महात्मा’ सोमय्या पुढे आले व लोकवर्गणीतून ‘विक्रांत’साठी आवश्यक असलेला निधी जमवून राजभवनात जमा करू असे जाहीर करून त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात मोठमोठे डबे फिरवून सामान्य जनतेकडून आणि व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. या सर्व पैशांचे काय झाले? कारण ‘विक्रांत’ भंगारात जायची ती गेलीच व ‘विक्रांत’च्या नावावर जमा केलेले कोट्यवधी रुपये राजभवनाच्या खात्यात जमा झालेच नाहीत असे सध्याच्या भाजपापुरस्कृत राज्यपालांनीच कळविल्याने भाजपाचे महात्मा किरीट सोमय्या व त्यांच्या दिवट्या पुत्राने देशाच्या नावाने केलेली लफंगेगिरी समोर आली आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

फडणवीसांची महाराष्ट्राला कीव येऊ लागली आहे
“भारतीय जनता पक्षातील अशा मंडळींचे राष्ट्रप्रेम, हिंदुत्व किती तकलादू आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ‘विक्रांत’ युद्धनौकेच्या नावाने केलेला भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराची भाजपापुरस्कृत सुरू झालेली वकिली! देशासाठी लाखो सैनिक रक्त सांडत आहेत, युद्धात बलिदान देत आहेत. त्या बलिदानाचा काळाबाजार करणाऱ्या किरीट सोमय्यांसारख्या देशद्रोहयाची वकिली करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला आता कीव येऊ लागली आहे. हेच काय तुमचे देशप्रेम? हेच काय तुमचे ‘वंदे मातरम्’? हेच काय तुमचे ‘जय जवान’?,” असा प्रश्न शिवसेनेनं फडणवीसांना विचारलाय.

नक्की वाचा >> सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”

स्वतःची प्रतिष्ठा ते धुळीस मिळवीत आहेत
“भ्रष्टाचाराची बाजू घेणे वेगळे, पण महाराष्ट्रद्वेषाने व शिवसेनेविषयीच्या चिडीने आंधळे झालेले भाजपाचे पुढारी ‘विक्रांत’च्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सोमय्यांच्या हातांना फुलांचे गजरे बांधू लागले आहेत. सोमय्या यांनी केलेला पैशांचा अपहार ही सरळ सरळ देशाची फसवणूक आहे. फडणवीस यांनी याप्रश्नी गप्प राहायचे सोडून स्वतःची प्रतिष्ठा ते धुळीस मिळवीत आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

भारतीय जनता पक्षाचे पुरते वस्त्रहरण
“किरीट सोमय्या यांनी युद्धनौका ‘विक्रांत’च्या पैशांचा अपहार केला हे पुरावे त्यांच्याच पक्ष कार्यालयातून म्हणजे महाराष्ट्राच्या राजभवनातून पुढे आले. मग आता राजभवनाच्या मागेही ते ईडी वगैरेचा ससेमिरा लावणार काय? सोमय्या यांनी ‘विक्रांत’च्या नावे जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय केले? हा पैसा त्यांनी कोणत्या माध्यमातून ‘मनी लॉण्डरिंग’ करून कोठे जिरवला? पी.एम.सी. बँकेच्या माध्यमातून हे कोट्यवधी रुपये त्यांनी काळ्याचे पांढरे केले काय? हे ‘राष्ट्रीय’ प्रश्न खरे तर आमचे नवहिंदुत्ववादी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पडायला हवे होते, पण ते ‘विक्रांत’ युद्धनौकेचा घोटाळा करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पुरते वस्त्रहरण झाले,” असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखामध्ये आहे.

पाटील आताही या देशद्रोही भ्रष्टाचाऱ्यांची पाठ थोपटणार काय?
“सोमय्यासारख्यांचा भ्रष्टाचारविरोधी लढा हा सदैव ब्लॅकमेलिंगचाच सौदा होता. ‘विक्रांत’ युद्धनौका वाचविण्यासाठी जमा केलेले ५८ कोटी हडपल्याचे एक प्रकरण आता समोर आले. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांनी महाराष्ट्र व देशात फिरवलेल्या डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपाच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कोठे पोहोचला? भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या इस्पितळात जाऊन याच सोमय्यांची पाठ थोपटली होती. चंद्रकांतदादा पाटील आताही या देशद्रोही भ्रष्टाचाऱ्यांची पाठ थोपटणार काय?,” असा प्रश्न विचारण्यात आलाय.

नक्की वाचा >> शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा राऊत अधिक महत्वाचे वाटतात का? MIM च्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “काहीजण अशा…”

अपमान देश सहन करणार नाही
“किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले. भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून ‘कमळा’च्या साक्षीने त्यांनी हिंदुत्वाशी हा व्यभिचार केला. कायद्याने कारवाई होईलच, पण अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा. जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे. सैनिकांच्या बलिदानाचा, भारतीय युद्धनौकेचा अपमान देश सहन करणार नाही,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.