शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आज एक खळबळजनक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांनी भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा, करत हा घोटाळाही उघड करा असं म्हटलं आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा. असं संजय राऊत यांनी पत्राद्वारे आवाहन केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.

संजय राऊत आपल्या पत्रात म्हणतात, सर्वच ठिकाणचे घोटोळे उघड करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण केली आहे. मागील अनेक वर्षांपासून तुम्ही हे करत आहात. सरकारी पैसा आणि मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले. खरं तर, अनेक सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना तुम्ही त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघड केल्यानंतर तुरुंगात जावं लागलं आहे.

मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की, अशातच एक भ्रष्टाचाराचं प्रकरण माझ्या निदर्शनास आलं असून, ते अत्यंत गंभीर आहे. यामध्ये तुम्ही लक्ष घालावं अशी मी तुम्हाला विंनती करतो आहे. मी पिंपरी-चिंचवडमध्ये गेलो होतो, तेव्हा मला सुलभा उबाळे व काही सदस्यांनी काही कागदपत्रं दिली आहेत, त्यावरून असं दिसून येते की पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झालेला आहे. आपण हा घोटाळा उघडकीस आणावा अशी विनंती मी आपल्याला करत आहे. २०१८-१९ कालावधीत काही कोटींचा गैरव्यवहार या स्मार्ट सिटी प्रकल्पात झालेला आहे, असंही संजय राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे.