देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपाला दादरा नगर हवेलीचा शिवसेनेचा विजय जिव्हारी लागल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा खासदार निवडूण आला. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत महाराष्ट्राबाहेर पहिले पाऊल, दादरा नगर हवेली मार्गे दिल्लीकडे लांब उडी घेणार असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

”दसऱ्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की तुम्ही दुसऱ्याचे उमेदवार घेऊन निवडणूक लढविली. पण, तुम्ही काय केलं. दादरा-नगर हवेलीमधील उमेदवार तुमचे होते का? आम्ही दुसरे उमेदवार घेतले तर आमच्यावर टिका-टिप्पणी केली जाते. पण, तुम्ही तेच करता त्याचे काय? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. टीव्ही ९ सोबत बोलत असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

“डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर सहानुभूतीची लाट होती त्यामध्ये तुम्ही निवडून आलात. आता बाकीच्या निवडणुका सुद्धा शिवसेनेने त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात. एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हा हास्यास्पद दावा आहे. सर्वसामान्यांना हे आवडेल की नाही ते बघा,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दादर नगर हवेलीच्या विजयानंतर शिवसेनेने हळूहळू महाराष्ट्राबाहेरही पाय पसरावेत, हे संजय राऊत पक्षनेतृत्वाला पटवून देण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गोवा आणि कर्नाटकातही पक्ष बांधणीच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या इंधनदर कपातीनंतर चंद्रकांत पाटील यांनी इंधनावरील दर कमी करण्याची महाराष्ट्र सरकारची दानत नाही असे म्हटले आहे. “केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्यांचे दर कमी होतील. केंद्राने केल्यानंतर महाराष्ट्राने दरामध्ये कपात करण्याची काही परंपरा नाही. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले तसे आपणही करु अशी महाराष्ट्र सरकारची दानत नाही. त्यामुळे मी काही आशावादी नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.