भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिची आई व भावानेच पैसे घेऊन तीन वेळा बालविवाह करून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान घरच्यांची पुन्हा चौथ्यांदा बळजबरीने विवाह लावून देण्याची तयारी सुरु असल्याचे समजताच पीडित मुलीने तेथून पळ काढून पोलीस ठाणे गाठत आपली सुटका करून घेतली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई , एक भाऊ , तीन पतींसह बारा जणांविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे . दरम्यान , एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे समजते. या विषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह अंदाजे तीन वर्षांपूर्वी तिच्या आई आणि भावांनी शेंदूर्णी येथील एका मुलाशी ( ता. जामनेर,जिल्हा जळगाव ) येथे पैसे घेऊन लावून दिला होता. तिथं एक महिना राहिल्यानंतर माहेरच्यांनी तिला परत आणून घेतले व पुन्हा सासरी पाठविले नाही. त्यानंतर आठ महिन्यांनी पुन्हा पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन दुसरा विवाह लावून दिला. येथे तीन महिने राहिल्यानंतर तिच्या भावांनी तिला परत भोकरदनला बोलावून घेतले व त्यानंतर पुन्हा पाच महिन्यांनी भोकरदन शहरातील एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडित मुलगी औरंगाबाद येथे एक वर्ष राहिली. मात्र, पतीसोबत वाद झाल्याने पीडित मुलगी चार महिन्यांपूर्वी माहेरी भोकरदन येथे आलेली होती .

दरम्यान, आई व भावांकडून पुन्हा चौथ्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे जळगाव जिल्ह्यातील पाहुणे पाहायला येणार असल्याचे तिला समजल्याने पीडित मुलीने चौथ्या लग्नाला विरोध केला असता तिच्या भावांनी तिला मारहाण केली. त्यामुळे आपण लग्न केले नाही तर आपल्या जीवाला धोका असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क केला . पोलिसांनी लगेच तिला भेटून चौकशी केली . या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई , दोन भाऊ , तीन पतीसह १२ नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.