सातारा : पालखी मार्गावर पाऊस पडत असतो. अशा वेळी निवारा न मिळाल्यामुळे कुठल्याही वारकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून पालखी मार्गावर सातारा जिल्ह्यात दहा हजार क्षमतेच्या वारकरी सेवा केंद्राची उभारणी करण्याचे आदेश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. ग्रामविकास मंत्री गोरे यांनी साताऱ्यातील बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, नीरा दत्त घाट पालखी तळांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या पाहणी वेळी आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, की संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. सध्या पालखी मार्गावर पाऊस पडत आहे, या पावसापासून वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी दहा हजार क्षमतेच्या वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना करून ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, वारकऱ्यांसाठी मोबाइल स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. पुरेशा प्रमाणात मोबाइल स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावीत. जसजशी पालखी पुढच्या गावात जाईल तशी मागची गावे जिल्हा परिषदेने स्वच्छ करावीत. विद्युत वितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळावर हायमास्क दिवे लावावे. तसेच बेकायदा वीज कनेक्शन घेतले जाऊ नयेत यासाठी पोलीस व विद्युत वितरण कंपनीने पथक तयार करून बेकायदा कनेक्शन कट करून टाकावेत व कायदेशीर वीज कनेक्शन द्यावीत.
आरोग्य विभागाने पालखी मार्गात वैद्यकीय पथके तैनात करावीत. तसेच वारकऱ्यांसाठी गॅस व केरोसीन पुरविण्यात यावे. अन्न व औषध प्रशासनानेही अन्न पदार्थ तपासणीसाठी पथक तैनात करावे. वेळोवेळी वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत ती कामे ताडीने पूर्ण करावीत. त्याचबरोबर जी कामे पूर्ण होणार नाहीत त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.
पालखी सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केल्या.