महाविकासआघाडीत विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून बिघाडी झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. काँग्रेसकडून शिवसेनेने परस्पर निर्णय घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी तर ही महाविकासआघाडी नैसर्गिक आघाडी नसल्याचं म्हणत मोठं विधान केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर ते अधिक चांगलं दिसलं असतं. मात्र, त्यांनी अशी चर्चा केली नाही. राष्ट्रवादीने पत्र देण्याआधी बाळासाहेब थोरातांशी थोडी चर्चा केली होती. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे. असं असलं तरी विरोधी पक्षनेता नेहमीच इतरांचाही पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतो.”

“नाना पटोले काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्यामुळे पटोलेंना उत्तर देणं मला आवश्यक वाटत नाही,” असं म्हणत जयंत पाटलांनी अधिक बोलणं टाळलं.

“निवड करताना मित्रपक्षांना विचारलं गेलं नाही”

“विधानसभेत सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र, विधान परिषदेत निवड करत असताना मित्रपक्षांना विचारलं गेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर तीन ते चार सदस्यांचाही पाठिंबा होता,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.

नेमका काय आहे वाद?

महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली. मात्र, विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही होती. पण शिवसेनेकडून विदर्भातील चेहरा असणारे अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

माध्यमांशी बोलण्यापूर्वी नाना पटोले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील यावर नाराजी व्यक्त केली. “विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणं आवश्यक होतं. मात्र, तशी चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही. निवड कुणाचीही होवो, पण चर्चा होणं गरजेचं होतं. त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“कायमस्वरूपी हा शब्द वापरलाच नाही”

दरम्यान, महाविकास आघाडी कायमस्वरूपी असल्याचा शब्द आम्ही कधी वापरलाच नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. “आमची ही काही नैसर्गिक आघाडी नाही. ही आघाडी विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यावेळी केली. आम्ही काही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा कौल आम्हाला जनतेनं दिला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती. आम्ही विपरीत परिस्थितीत आघाडी केली. कायमस्वरूपी असा शब्द आम्ही वापरला नाही. नैसर्गक आघाडी असं आम्ही म्हटलंच नाही”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil comment on nana patole remark about mva pbs
First published on: 11-08-2022 at 15:01 IST