मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत भाष्य केले आहे. “याला सर्वधर्म समभाव म्हणतात. सगळ्यांचा सन्मान ठेवणे आणि सर्वांना समानतेने वागवणे याची ही पद्धत आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी आता तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो, आता राज ठाकरे एका बाजूने हा आग्रह करणार आणि थोड्या दिवसाने ओवीसी हे पिक्चरमध्ये येणार,यामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा, त्याही पुढे काही तरी अघटित घडविण्याच्या प्रयत्नांची ही सुरूवात आहे. महाराष्ट्रला या गोष्टी हळूहळू दिसतील. महाराष्ट्रात पेट्रोल,डिझेल, सिमेंट,स्टील महागाई याबाबतची चर्चा होत नाही. पण हनुमान चालीसाची चर्चा होते. आम्ही हनुमान,रामाचे ही भक्त आहोत,पण आम्ही याच कधी प्रदर्शन करीत नाही. त्यामुळे अंत्यत जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांना वापरणे हे आम्ही कधी केलेल नाही,” असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, मनसेने शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त पुणे शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अलीकडेच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशभरातील मशिदींबाहेरील लाऊडस्पीकरच्या विरोधात भूमिका घेतली आणि ३ मेपर्यंत ते हटवण्याची मागणी केली आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकर न काढल्यास मनसे मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवेल, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. याच अनुषंगाने हनुमान जयंतीला पुणे शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.