शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (२३ जानेवारी) केली. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेशी युती झाली. पण, अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीत येण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एबीपी माझा’शी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

“राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही…”

शरद पवारांवरील प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. “प्रकाश आंबेडकर सध्या उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करत असल्याने विधान करण्याचा अधिकार राखून ठेवतो. पण, अजित पवार असं कुठं बोलले असतील वाटत नाही. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पर्याय नसल्याने, ही खेळी असू शकते. मात्र, नंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केलं. राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नाही. शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

आणखी वाचा – संघ, भाजपाच्या विचारधारेवर बोलताना प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले; “मला भाजपासोबत जायचे असेल तर..”

“याचं प्रकाश आंबेडकर कौतुक का…”

‘काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची गरज होती, शिवसेनेला नाही,’ असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. याबद्दल विचारलं असता, जयंत पाटील म्हणाले, “शिवसेना आमच्याबरोबर आली कारण त्यांना गरज होती. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो कारण आम्हाला सत्तेची गरज होती. उलटपक्षी भाजपाला रोखण्याचं काम शरद पवारांनी केलं, याचं प्रकाश आंबेडकर कौतुक का करत नाही. प्रकाश आंबेडकर भाजपाचे विरोधक असतील, तर त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं पाहिजे.”

आणखी वाचा – “प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण?” शरद पवारांवरील विधानावरून अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले, “बाळासाहेबांचा स्वभाव…”

“भाजपाचा पराभव महाराष्ट्रात होऊ शकतो, तो…”

“भाजपाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी भूमिका काय आहे, याला मी जास्त महत्व देतो. शरद पवारांना त्यांचा विरोधी ही भूमिका जुनीच आहे. परंतु, भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. भाजपाचा पराभव महाराष्ट्रात होऊ शकतो, तो करण्यासाठी सहाय्यभूत झालं पाहिजे,” असे आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil reply prakash ambedkar over statement sharad pawar together with bjp ssa
First published on: 26-01-2023 at 00:06 IST