हिंगोली : जिल्ह्यातील पिंपळदरी येथील वीरमाता रूख्माबाई भालेराव यांचा मुलगा कविचंद यांना सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना अनंतबाग येथे वीरमरण आले. त्यांचा एक मुलगा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. करोनाच्या टाळेबंदीत आणि जिल्हाप्रवेश बंदीत तो अन्य जिल्ह्यांत अडकून पडल्याने या वीरमातेला जीवन जगणे असह्य झाले होते. रुख्माबाईंची ही परवड लोकसत्ताह्ण मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वीरमातेला शासनाकडून चार एकर जमिनीचे कागदपत्र पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी देण्यात आले. रुख्माबाईंच्या एका मुलाला वीरमरण आले तर दुसरा मुलगा टाळेबंदीमुळे इतर जिल्ह्यात अडकल्याने त्या आपल्या नातवासोबत गावीच राहात होत्या. घरी कोणी कमावते नसल्याने त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. याविषयीची बातमी लोकसत्ताह्णमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दखल घेऊन रुख्माबाईंना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केली. दिवंगत खासदार राजीव सातव, माजी आमदार डॉ.संतोष टारफे यांनीही वीरमाता रुख्माबाई यांच्या हलाखीच्या परिस्थितीची दखल घेऊन त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेतून मदत करण्याठी प्रयत्न सुरू केले.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे जमीन मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविला. मात्र,काही तांत्रिक अडचणी येत असल्याने दारिद्रय रेषेखालील आणि ६० वर्ष वयाची अट वीरमातेच्या मदतीसाठी मंत्रीमहोदयांनी शिथिल केली आणि त्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते वीरमाता रूख्माबाई भालेराव यांना प्रजासत्ताक दिनी कळमनुरी तालुक्यातील सव्र्हे नं.४२-१ मधील चार एकर जमिनीची कागदपत्रे प्रदान करण्यात आली. यासाठी विभागीय आयुक्त केंद्रेकर, तत्कालीन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव घोंगडे यांनीही सतत पाठपुरावा केला. ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अखेर वीरमातेला न्याय मिळाला असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते बाबुराव घोंगडे यांनी व्यक्त केली.