मान्सूनने मुंबईत आज जोरदार हजेरी लावल्याने, मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईतील अनेक भागांमधील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरिपीट उडाली. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. तर, हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून राज्य सरकार तसेच मुंबई मनपावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या मुद्यावरून निशाणा साधला आहे.

“पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.

तर, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देखील टीका केलेली आहे. “मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा म्हणतील. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे”. असा टोला त्यांनी लगावला आहे.

“महापालिका आणि ठाकरे सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल”

“मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे.”, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांच्या टीकेनंतर आज माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं आहे.

मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता – किशोरी पेडणेकर

याशिवाय, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही माध्यमांशी बोलताना मुंबईच्या परिस्थितीची माहिती दिली आहे. मुंबईत एका तासात ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.