राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातल्या अनेक भागात आंदोलन केलं जातंय. दरम्यान, भाजपा नेतेही या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या फेसबूक पोस्टची चांगलीच चर्चा सुरू आहे.

केशव उपाध्ये यांनी काल शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाचा निषेध करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मग ‘ही’ महाराष्ट्राची संस्कृती आहे का?

ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो दुर्देवीच आहे. या प्रकारामागे कोण हे पोलीस शोधून काढतीलच. ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगत अचानक अनेकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उमाळे दाटून आलेत. खरं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच…

“नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही पण  याची सुरूवातच काँग्रेस नेत्यांनी केली. भाजपा नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणारे कोण होते?, एखाद्या मंत्र्याच्या विरोधात कोणी फेसबुक पोस्ट केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन त्याला मारहाण करणे, पोलिसाला मारहाण केली म्हणून न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला मंत्रिपदी कायम ठेवणे, दाऊदशी संबंधित गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहाराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगात असलेला नेता मंत्रिपदी कायम ठेवणे, मंत्र्याने पोलिसांना बोलावून महिना शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश देणे, काळ्या पैशावर कारवाई म्हणून ज्याची संपत्ती जप्त झाली त्याचे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढणे, राज्यपालांना सरकारी विमानातून उतरवणे, उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटके ठेऊन साक्षीदाराचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाठराखण करणे, सरकारी वकिलाच्या पुढाकाराने खोटे पुरावे तयार करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गोवणे, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हेगार ठरविणे, जनादेशाचा अपमान करून आणि विश्वासघात करून सरकार स्थापन करणे, आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना पंढरपुरात महापूजेपासून रोखणं, ही सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती नाही,” असं केशव उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.