भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचारावरून टीका करतानाच ठाकरे सरकारचे ३१ डिसेंबरपर्यंत ४० घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा दिला. तसेच आतापर्यंत २८ घोटाळे समोर आणले आहेत. पुढील काही दिवसात ४ मंत्र्यांचे घोटाळे उघड करू, असंही त्यांनी सांगितलं.

किरीट सोमय्या म्हणाले, “आम्ही ३१ डिसेंबरपर्यंत ४० घोटाळे लोकांसमोर आणलेले असतील. आतापर्यंत २८ घोटाळे बाहेर काढलेत. पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे ४ मंत्र्यांचा समावेश असेल. त्यांच्याबाबत वेगवेगळे तपास संस्थांना मी तक्रारी केल्या आहेत.”

“शिवसेनेचे २ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ अशा ४ मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार”

“या ४ नेत्यांमध्ये २ शिवसेनेचे आहे. हे २ जण मुख्यमंत्र्यांच्या मित्रपरिवाराचे महत्त्वाचे सदस्य आहेत. यात काँग्रेसच्या विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. त्याची फाईल पण आलीय. सर्व तपास यंत्रणांना कागदपत्र आणि तक्रारी पाठवल्या आहेत. चौथे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत,” असंही सोमय्या यांनी नमूद केलं.

हेही वाचा : “दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

“उद्या मी जालन्याला जाणार आहे. अर्जून खोतकर यांचा साखर कारखाना घोटाळा बाहेर आलाय. उद्या त्यांनी केलेला एपीएमसी मार्केट घोटाळा समोर आणू. दोन्हीत शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये लुटले. त्याची माहिती जनतेला देणार आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार आहे. यात ३ मंत्री आणि ३ जावई असल्याचं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला होता. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

किरीट सोमय्या म्हणाले होते, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले.”