सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेल व कारखान्याचे विद्यमान चेअरमन मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनलमध्ये प्रचाराची जोरदार रणधुमाळी उडाली होती. गेली एकोणीस वर्षे कारखान्यावर सत्ता गाजविणाऱ्या माजी आमदार मदन भोसले यांच्या वर्चस्वाला धक्का देत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारून सर्व २१ जागावर निर्विवाद वर्चस्व मिळविले. किसन वीर साखर कारखान्यासाठी ३ मे रोजी ६९.३१ टक्के मतदान झाले होते. आज(गुरुवार) झालेल्या मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून ऊस उत्पादक गटातून व राखीव गट आणि सोसायटी मतदार संघात मकरंद पाटील पॅनेलने आघाडी घेतली होती. कवठे-खंडाळा व भुईंज या सोसायटी गटात आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले . तर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांचा शेतकरी विकास पॅनेल मात्र पिछाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत गेले. कवठे-खंडाळा गटात नितीन पाटील २२२४४ मते घेऊन आघाडी घेतली तर भुईंज गटात माजी आमदार मदन भोसले हे १२९७० मतांसहित पिछाडीवर राहिले. दोन दशकाच्या कालावधीनंतर आमदार मकरंद पाटील गटाने किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतली. यंदाच्या कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनल मध्ये थेट लढत झाली. दोन्ही गटांनी आपणच निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला होता. पहिल्या फेरीतील मतमोजणीचे निकालामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलने कवठे-खंडाळा गटात व भुईंज वाई बावधन जावली सातारा कोरेगाव ऊस उत्पादक गटात आघाडी घेत मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा सरासरी नऊ ते साडेनऊ हजारांच्या फरकाने जिंकत मदन भोसलेंचा दारुण पराभव केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे - आमदार मकरंद पाटील सोसायटी मतदारसंघ (२३८) अनुसूचित जाती जमाती -गट-संजय कांबळे ( २२७२४),भटक्या विमुक्त जाती जमाती-हणमंत चवरे ( २२६६६१), महिला राखीव- वीर सरला (२१५६१)जाधव सुशीला (२२३९४),इतर मागास वर्ग-शिवाजी जमदाडे (२२६१०),ऊस उत्पादक गट-कवठे खंडाळा-नितीन जाधव पाटील (२२२४४)रामदास गाढवे(२२१५५)किरण काळोखे (२१७१६), भुईंज -प्रमोद शिंदे (२१५०७)प्रकाश धरगुडे (२१६७९)रामदास इथापे (२१५६८), वाई बावधन जावली- दिलीप पिसाळ (२२३५९)शशिकांत पिसाळ(२२०५८)हिंदुराव तरडे(२१४६९),सातारा -संदीप चव्हाण (२२११०)सचिन जाधव(२३०३६), बाबासाहेब कदम (२१८३३) ,कोरेगाव -ललित मुळीक (२१७६७)संजय फाळके (२१७७३) सचिन साळुंखे (२१५३२) शेतकरी सभासद व कामगारांचा विजय - आमदार मकरंद पाटील कारखाना निवडणुकीतील विजय ५२ हजार शेतकरी सभासद व कामगारांचा आहे. गेली १९ वर्षे सत्तारूढ मंडळींनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केले. प्रचंड भ्रष्टाचार केला. शेतकऱ्यांची देणी दिली नाहीत. उलट कारखान्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला. कामगारांना वेळेवर वेतन दिले नाही. किसन वीर यांनी स्थापन केलेले आणि शेतकऱ्यांचे वैभव असलेले सहकार मंदिर रसातळाला गेले. परिणामी कारखान्यात सत्तांतर घडले. अशी प्रतिक्रिया आमदार मकरंद पाटील यांनी दिली.