सावंतवाडी: कोकणचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्याला यंदा बदलत्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हापूस आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला असून, मार्च महिना संपत आला तरी सावंतवाडीच्या बाजारपेठेत अद्याप आंब्याचा हवा तसा घमघमाट सुटलेला नाही. आवक घटल्याने बाजारात दाखल झालेल्या आंब्याचे दर गगनाला भिडले असून सामान्य ग्राहकांसाठी हापूस सध्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र आहे.
सावंतवाडी शहरात दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच आंबा बागायतदारांची लगबग पाहायला मिळते. भल्या पहाटे उठून सावंतवाडी, वेंगुर्ले आणि देवगड भागातील बागायतदार आपला माल विक्रीसाठी शहरात घेऊन येतात. पहाटेच्या वेळी बाजारपेठेत होणारी ही गर्दी आणि आंब्याचा सुटणारा सुगंध हे या मोसमाचे वैशिष्ट्य असते. मात्र, यंदा ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. सकाळी बाजारपेठेत होणारा हा गजबजाट अद्यापही सुरू झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा हवामानात वारंवार होणारे बदल आणि मध्येच झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बागायतदारांच्या मते, जवळपास ९० टक्के पीक वाया गेले आहे. मोहोर गळणे, फळधारणा न होणे आणि कीड लागणे अशा समस्यांमुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. ज्यांच्याकडे थोड्या प्रमाणात आंबा तयार झाला आहे, त्यांनी तो विक्रीसाठी बाजारात आणला आहे.
आज सावंतवाडी तालुक्यातील हापूस आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला. मात्र, अत्यंत कमी आवक असल्याने त्याचे दर चढेच आहेत. गुणवत्तेनुसार (प्रतिनुसार) या आंब्याला ११०० रुपये, १२०० रुपये आणि १४०० रुपये प्रति डझन असा दर लावण्यात आला आहे. अव्वाच्या सव्वा दरामुळे हौशी खवय्यांनीही सध्या आंब्याकडे पाठ फिरवली आहे.
बागायतदार आधीच आर्थिक संकटात असताना, आता वाढलेल्या दरामुळे विक्रीवरही परिणाम होत असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पुढील काही दिवसांत हवामान स्थिर राहिल्यास आणि आवक वाढल्यास दरात काहीशी घट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, एकूणच ९० टक्के पीक हातातून गेल्याने यंदाचा आंबा हंगाम बागायतदारांसाठी आर्थिकदृष्ट्या तोट्याचाच ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
