दोन महिला कॉन्स्टेबलच्या त्रासाला कंटाळून एका ४२ वर्षीय पुरुष कॉन्स्टेबलने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी दोन्ही महिला कॉन्स्टेबल विरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मृत पोलीस कॉन्स्टेबलचे दोन्ही महिलांसोबत प्रेमसंबंध होते. हा पोलीस कॉन्स्टेबल विवाहित आहे हे माहित असूनही दोघींनी त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता.

आम्हा दोघींपैकी एकीबरोबर लग्न कर अशी त्यांची मागणी होती. अखेर या रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून कॉन्स्टेबलने २४ सप्टेंबरला विष प्राशन केले. शनिवारी या कॉन्स्टेबलचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत कॉन्स्टेबलच्या पत्नीने दोघींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मृत कॉन्स्टेबल आणि दोन्ही महिला २०१२ ते २०१४ दरम्यान गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये एकत्र होते.

त्या दरम्यान त्याचे दोघींबरोबर सूत जुळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रेम प्रकरणाबद्दल समजल्यानंतर त्यांनी तिघांची जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये बदली केली. मृत कॉन्स्टेबल इचलकरंजी येथील पोलीस स्टेशनमध्ये तैनात होता. बदली झाल्यानंतरही दोन्ही महिला आपल्या नवऱ्याच्या संपर्कात होत्या. प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी दोघी त्याच्यावर जबरदस्ती करत होत्या. दोघींपैकी एकीने त्याच्या पत्नीला घटस्फोट घेण्यासाठी धमकावले होते असे कॉन्स्टेबलच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.

अखेर दोघींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने २४ सप्टेंबरला विष प्राशन केले. शनिवारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्याचे निधन झाले. दोन्ही आरोपी महिलांविरोधात कलम ३०६,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.