घराच्या वादावरून झालेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयाने आज (शनिवार) १० जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी गायत्री उर्फ राणी गणेश गुरव (वय २३, रा. मुदाळ,ता. भुदरगड) यांनी फिर्याद दिली होती. राणी गुरव यांचे आजोबा निवृत्ती गुरव यांनी गावातील वडिलोपार्जित घर आरोपी अशोक गोविंदराव पाटील यांना विकल्याच्या कारणावरून दिवाणी न्यायालयात खटला सुरू होता. यावरून चिडलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून २५ नोव्हेंबर २०११ रोजी मारहाण केली होती. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त सरकारी वकील ए . एम. पिरजादे यांनी युक्तिवाद केला होता. सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्या. बी. डी. शेळके यांनी आरोपींना पाच कलमान्वये प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी व अन्य एका कलमान्वये प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी तसेच साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेले आरोपी - अशोक पाटील, काकासाहेब पाटील, संभाजी निवृत्ती गुरव, मालुताई संभाजी गुरव, निवृत्ती पाटील, शर्मिला अशोक पाटील, साधना काकासाहेब पाटील, सुलाबाई बंडेराव पाटील, बाबूराव दत्तू पाटील, सुनिता निवृत्ती पाटील