पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना कोल्हापुरातील कणेरी तालुक्यातल्या करवीर येथे घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

कोमल निशिकांत चव्हाण (वय २८ ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित पती निशिकांत सुरेश चव्हाण (वय ३२) याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरपासून जवळच असलेल्या कणेरी गावातील एकता कॉलनी परिसरात दीपक पोवार यांच्या घरात चव्हाण पती-पत्नी भाडेकरू म्हणून राहत होते. निशिकांत हा पत्नीवर नेहमी चारित्र्यावर संशय घेत असे. तिचे कोणाशी तरी प्रेमसबंध आहेत, असे तो म्हणत असे. त्यावरून दोघात नेहमीच वाद होत असत. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भांडण झाल्यावर निशिकांतने कोमलचा दोरीने गळा दाबून खून केला. त्यांनतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केल. पण दोरी तुटल्याने तो बचावला. या उभयतांना दोन मुले आहेत.