Maharashtra Breaking News Live Updates, 02 January 2023 : मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आक्रमक होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली होती. तसेच याप्रकरणी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दरम्यान, या आरोपाला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सौमय्यांनी आधी मुख्यमंत्र्यांच्या सहा बंगल्यावर बोलावं असे त्या म्हणाल्या. हा विषय सुद्धा दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.