अमरावती : एका वकिलाच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघाने बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले असून जोपर्यंत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरुच राहील, अशी ठाम भूमिका अमरावती जिल्हा वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली आहे. गुरुवारी वकिलांनी कामकाज बंद ठेवल्यामुळे न्यायालयीन कामकाजावर प्रभाव पडला होता. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शोएब खान यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना निवेदन सादर करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यंत पोलीस निरीक्षक आसाराम चोरमलेंवर कारवाई होत नाही, तोपर्यंत जिल्हा वकील संघाचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु राहणार आहे. या कामबंद आंदोलनात पाचशे ते सहाशे वकील सहभागी झाले असून, या काम बंद आंदोलनामुळे कामकाजावर मोठा प्रभाव पडला आहे, आज न्यायालयात एकाही प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. ॲड. अंकुश तागडे यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना जबर मारहाण केली. कुख्यात आरोपीसारखी वागणूक देऊन हातकडी लावून न्यायालयात नेण्यात आले. हे सर्व अन्यायकारक आहे. ॲड. तागडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे वकील संघाचे अध्यक्ष शोएब खान यांनी सांगितले. कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात कामबंद आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले.