राहाता : भाजपाचे नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे म्हणाले, की गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्या वेळी बापट साहेब संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे.
पण राजकारणात फार कटूता येऊ न देता संवादामुळे सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीश बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे यांनी गिरीश बापट यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.