विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवसभरात राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले, मुंबईत परत येताच देवेंद्र फडणवीस काही भाजपा नेत्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. याठिकाणी जवळपास एक तास चर्चा झाली. या बैठकीनंतर बहुमत चाचणी घेण्यासाठी भाजपाकडून राज्यपालांना पत्र देण्यात आलं आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, आज राज्यपालांना ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र दिलं आहे. यामध्ये राज्यात सध्या जी परिस्थिती सुरू आहे, याचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानुसार, शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे मविआने बहुमत सिद्ध करावं, याबाबतचं पत्र राज्यपालांना दिलं आहे. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देऊ इच्छित नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित पत्रात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा देखील उल्लेख करण्यात आला असून त्यावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी योग्य तो निर्णय घेतील, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

खरंतर, मागील काही दिवसांपासून भाजपानं शिवसेना बंडखोरी प्रकरणात मौन धारण केलं होतं. यानंतर आता भाजपाच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास ३० मिनिटं चर्चा झाली. दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आले आणि भाजपाच्या काही नेत्यांसह त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बहुमत चाचणी घेण्यासाठी राज्यपालांना पत्र दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter from bjp to governor bhagat singh koshyari to take floor test devendra fadnavis eknath shinde rmm
First published on: 28-06-2022 at 22:55 IST