जन्मत:च दोन्ही हात नसलेल्या ऋषिकेश सोबत विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेणार्या प्राचीच्या प्रेमाचा आज समाजासमोर आदर्श उभा राहिला आहे. त्याच्या निखळ प्रेमाला तिने दिला सहजीवनाचा हात दिला. ऋषिकेश हा दुधेबावी( ता फलटण) गावचा आहे. प्राची ही त्याच तालुक्यातील सांगवीला राहणारी आहे. ऋषिकेश हा दिव्यांग आहे. त्याला जन्मतःच दोन्हीही हात नाहीत. ऋषिकेशने बालपणापासूनच त्याच्यातील या न्यूनत्वाची जागा अफाट जिद्दीने घेतली. दहावीच्या परीक्षेत त्याने पायाने पेपर लिहित चक्क नव्वद टक्के गुण मिळविले. संगणकाच्या परीक्षेत तर त्याने शंभर पैकी शंभर गुण मिळविले. पायाने उत्तमोत्तम चित्रे काढण्यात ऋषिकेश निपुण आहे. अलीकडच्या काळात संगीत हा त्याचा छंद बनला. त्यातून उत्तम संगीत संयोजक म्हणून त्याची ख्याती झाली. 'मन चांदणं झालं', 'जगण्याच्या खेळामंधी', 'लत इष्काची' यांसारख्या दर्जेदार अल्बमची त्याने निर्मिती केली. त्या निमित्ताने त्याचा प्राचीशी परिचय झाला. प्राचीही उत्तम गाते. ऋषिकेश अन् प्राची फलटणमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकतात. दोघांच्या परिचयाचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. गेली तीन वर्षे त्यांची ही प्रेमकहाणी आकार घेत होती. अलीकडेच प्राचीने ऋषिकेशबरोबर विवाहाचा निर्णय घेतला. अर्थातच त्याला विरोध झाला. मात्र, या विरोधाला न जुमानता प्राची आपल्या निर्णयावर ठाम राहिली. प्राचीने ऋुषिकेशच्या कर्तृत्वावर आणि कर्तबगारीवर विश्वास ठेवला आणि त्यांच्यासोबत विवाहाचा धाडसी निर्णय घेत दोघांनी तो पुर्णत्वास देखील नेला. दोघांनी विवाह नोंदणी पद्धतीने करून त्यांच्या मंगल सहजीवनाच्या बंधनात बांधून घेतले आहे. "आपला जीवनसाथी काय करतो,त्याचा पगार,उत्पन्न किती आहे.या पेक्षा तो माणूस म्हणून कसा आहे? हे माझ्यासाठी महत्वाचे होते. त्याच्यात कर्तृत्व आणि धडाडी आहे का हे पहिले पाहिजे .मी याच गुणांवर त्याच्या प्रेमात पडले आणि लग्न केलं.", असं प्राचीनं सांगितलं.