यवतमाळमधील एका कार्यक्रमामध्ये आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना कोश्यारी यांनी महाराष्ट्रामधील कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सुत्रसंचालन झालं पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. मराठी ही मातृभाषा आहे याचं भान राखलं पाहिजे असं सांगतानाच कोश्यारी यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा आणि त्यानंतर झालेल्या परिणामांबद्दल भाषणामध्ये भाष्य केलं.

संस्कृतचा अभ्यास मी केला नाही, इंग्रजीचा अभ्यास करुन ते नंतर विसरुन गेलो. त्यामुळे मी धड इकडचा राहिलो नाही आणि तिकडचाही झालो नाही. आपली मराठी भाषा ही सगळीकडे आवश्यक (अनिवार्य) असली पाहिजे, असं कोश्यारी यांनी सांगितलं.

तसेच पुढे बोलताना, जेव्हा मी महाराष्ट्रात आलो तेव्हा मला अनेक शैक्षणिक संस्थाच्या कार्यक्रमांना बोलवण्यात आलं. तेव्हा मी एका ठिकाणी एक गोष्ट पाहिली की सूत्रसंचालक इंग्रजीमध्ये बोलताना दिसला. त्यावेळी मी त्याला हटकलं. मी त्याला ओरडलो आणि विचारलं की तुला मराठी ठाऊक नाही का? अरे हा महाराष्ट्र आहे. इथे मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं पाहिजे. प्रमुख पाहुणे बाहेरच्या राज्यातील असेल, परदेशातील असेल किंवा त्यांना मराठी, हिंदी कळत नसलं तर इंग्रजी समजू शकतं. पण आता मराठीत बोलण्यास काय अडचणी आहे?, असा प्रश्न आपण त्याला विचारल्याचं कोश्यारी यांनी सांगितलं.

“आता इथे हिंदी मंडळाच्या कार्यक्रमात दर्डाजी (खासदार विजय दर्डा) इंग्रजीत बोलू लागले तर तसं वाटेल. माझं म्हणणं आहे की, इंग्रजी शिकून इंग्रजांचे गुलाम बनू नका. इंग्रजी शिकून त्यांच्यावर राज्य करायला शिका. त्यासाठीच तर इंग्रजीचा वापर केला पाहिजे,” असंही राज्यपाल म्हणाले.

तसेच, “त्या दिवसानंतर मी जिथेही जातो तिथे लोक माझ्याशी मराठीमध्ये बोलतात. सूत्रसंचालनही मराठीमध्ये करतात. संस्कृत आणि हिंदीप्रमाणेच मला मराठीही फार गोड भाषा वाटते कारण ती फार सरळ, साधी भाषा आहे. बोलण्याचा माझा अभ्यास अजून झालेला नाहीय. सध्या मी मराठी वाचू शकतो आणि समजू शकतो,” असं कोश्यारी यांनी सांगितलं.