राज्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात करोनाच्या ४६ हजार ३९३ नव्या रुग्णांची भर पडली असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३०,७९५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी राज्यात करोनाच्या ४८ हजार २७० रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे. राज्यात शनिवारी ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.९१ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७० लाख ४० हजार ६१८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०३ टक्के आहे. तर शनिवारी राज्यात ४१६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत २७५९ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. राज्यात करोना प्रार्दुभावामुळे चिंताजनक स्थिती असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत परिस्थिती सुधारत असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईतील करोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असून, गेल्या २४ तासांत मुंबई साडेतीन हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. तर १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३,५६८ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २३१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या ९,९५,५६९ वर पोहोचली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत मागील २४ तासांत १० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ३२ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. तर २४ तासांत करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि हाय रिस्क असलेल्या २५,५९० जणांचा शोध घेण्यात आला आहे.