MSBSHSE Maharashtra Board Class 12th Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. ११ वाजता निकाल जाहीर करताना परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सविस्तर माहिती दिली. ज्या ठिकाणी कॉपीचे प्रकार घडले अशा १२४ केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शरद गोसावी यांनी काय सांगितलं?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी ९१.८८ आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान १२४ केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळून आले. त्याबाबत परीक्षा मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
कॉपी आढळलेल्या १२४ केंद्रांबाबत काय म्हणाले गोसावी?
काही केंद्रांवर गैरप्रकार झाले त्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्ग प्रकरण होतील, त्या केंद्राची मान्यता यापुढे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असे आधीच जाहीर करण्यात आले होते. यावर्षी मार्च २०२५ च्या १२ वीच्या परीक्षेमध्ये १२४ केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे आढळले आहेत. त्यामुळे नियमानुसार, त्याची चौकशी करून कशी करून ही केंद्र पुढील परीक्षेपासून कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. याबाबत परीक्षेपूर्वीच निर्णय घेतला होता. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे गोसावी यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे कॉप्या आढळलेल्या परीक्षा केंद्रांना मोठा दणका बसला आहे. परीक्षेच्या कालावधीत १२४ केंद्रांवर ३६६ कॉपी केसेस समोर आल्या, तर या सर्व केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करणार असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी स्पष्ट केलं.
कुठे कुठे झाले कॉपीचे प्रकार ?
पुण्यात २५ केंद्रावर ४५ कॉपी प्रकार झाले
नागपूरमध्ये १९ केंद्रावर ३३ कॉपी केसेस झाल्या
संभाजीनगर ४४ केंद्रावर २१४ कॉपी केसेस
मुंबईत ५ केंद्रावर ९ केसेस
कोल्हापूरमध्ये ३ केंद्रावर सात कॉपी केसेस झाल्या
अमरावती १० सेंटरवर १७ केसेस घडल्या
नाशिक ६ सेंटरवर १२ कॉपी केसेस
लातूर मध्ये ११ सेंटरवर २९ कॉपी केसेस
कोकणात एका सेंटरवर १ कॉपी केस
१२४ सेंटरवर कॉपी केसेस झाल्या. १२४ सेंटरची मान्यता चौकशीनंतर नियमानुसार रद्द करण्यात येणार.
विभागनिहाय निकाल २०२५
कोकण -९६.७४
कोल्हापूर ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६
बारावीच्या निकालातही मुलींची बाजी
निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते. नोंदणी केलेल्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांपैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील १ लाख ४९ हजार ९३२ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा ९७.३५ टक्के, कला शाखेचा ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८३.२६ टक्के, आयटीआयचा निकाल ८२.०३ टक्के लागला.