महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी दररोज १ लाख लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ देण्याचा मानस असल्याचं सांगितलं. शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच याची व्याप्ती वाढवून १ लाख थाळी करण्यात येणार आहे. यासाठी १५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यशासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुकास्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले होते. "शिवभोजन ही प्रायोगिक तत्वावरील योजना असून टप्प्याटप्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून थाळींची संख्या देखील वाढवली आहे," असंही त्यांनी नमूद केलं होतं.