थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेतून का होऊ नये, असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यावर “घटना बदला असं तुम्हाला सुचवायचं आहे का?” असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे. त्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे आपण मुख्यमंत्री निवडतो. नगराध्यक्ष निवडीचे अधिकार राज्यांना दिलेले आहेत, असेही शिंदे यावेळी म्हणाले. आमचं सरकार घटनेप्रमाणेच चालतं, असा टोलाही शिंदेनी अजित पवारांना लगावला. नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड थेट जनतेतून व्हावी, ही मागणी जनतेचीच होती. हा आमचा अजेंडा नसल्याचे शिंदे यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान स्पष्ट केले.

“आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, फडणवीसांना उद्देशून बोलताना अचानक अजित पवार संतापले

मुख्यमंत्री सक्षम नाहीत, या विरोधकांच्या टीकेवर देखील शिंदेनी यावेळी उत्तर दिले. सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? असा उलट सवाल शिंदेनी विरोधकांना केला. “दादा ते तुमचं ऐकत होते म्हणून ते आमचं ऐकत नव्हते” असे म्हणत शिंदेनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

“घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है”, बारामतीमधील हत्येचा थेट अधिवेशनात उल्लेख करत अजित पवार म्हणाले…

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून विविध विधेयकं पटलावर मांडली जात आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष निवड विधेयकाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केलं. “महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव आहे”अशी टीका यावेळी मुंडेंनी शिंदेवर केली.