काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे आक्षेपार्ह विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांची जीभ घसरली. ‘‘मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही.’’ त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे म्हणत भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपाकडून राज्यभरात आंदोलने करण्यात येत असून नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडले आहे. पोलिसांकडून लोकांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. पण भाजपा बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न जे केंद्र सरकारने निर्माण करुन ठेवले आहेत. या सगळ्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपा एखाद्या मुद्द्याला घेऊन अर्थाचा अनर्थ करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते या पद्धतीचे कृत्य करत आहेत. पंतप्रधान हे पद देशाचे पद आहे कोणत्याही एका पक्षाचे नाही हे काँग्रेसला चांगलेच समजते. काँग्रेसने देशाला मोठे केले आहे. पंतप्रधानांचा गौरव काँग्रेसला माहिती आहे. ज्या पद्धतीने भाजपा सगळे करोनाचे नियम तोडून आंदोलन करत आहेत. कोणत्याही कारणाशिवाय माझ्या अटकेची मागणी करत आहेत. मी भंडारा पोलिसांना याबाबत तपास करण्यास सांगितले आहे. लोकांनी तक्रार केलेला गावगुंड तिथे नसेल तर निश्चितपणे माझ्यावर कारवाई करा,” असे नाना पटोले म्हणाले. “मी त्यावेळी भाषण देत नव्हतो. मी लोकांच्या तक्रारी ऐकून त्याबद्दल बोलत होतो. त्यामुळे हे प्रकरण एवढे मोठे करुन महाराष्ट्राची बदनामी करण्याचे भाजपाकडून प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राची जनता भाजपाला निश्चितपणे जागा दाखवेल,” अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली. “पोलीस त्या गावगुंडाबाबत तपास करत आहेत. लोकांना हिंमत देण्यासाठी आणि तुम्ही घाबरु नका असं सांगायचं माझं कर्तव्य आहे. जे मोदी फसवणूक करुन या देशातून पळाले त्याबद्दल हे लोक का नाही बोलत. मनमोहन सिंग ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी नरेंद्र मोदी त्यांच्याबद्दल कशापद्धतीने बोलत होती याचा विसर त्यांना पडला असेल. पण काँग्रेसच्या वतीने कधीही पंतप्रधान पदाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे,” असे पटोले म्हणाले.