राज्यात करोनाचा कहर आता कमी होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला होता. आज राज्यात १ हजार ९७६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ६३ हजार ९३२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४% एवढे झाले आहे. आज राज्यात १ हजार ०९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आज रोजी राज्यात एकूण १२ हजार ४१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३५,२२,५४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२०,४२३ (१०.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,२९,७१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्राने करोना लसीकरणात दहा कोटीचा टप्पा देखील गाठला आहे.