राज्यातील करोनाची रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात करोनाच्या ४८ हजार २७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात ४२, ३९१ रुग्ण करोवर मात करुन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी राज्यात करोनाच्या ४६ हजार १९७ करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे ५००८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत शुक्रवारी १२,९१३ रुग्णांनी करोनवर मात केली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १४,१७८ आहे. १४४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात शुक्रवारी १४४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत २३४३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११७१ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. राज्यात शुक्रवारी ५२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर १.९१ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७० लाख ९ हजार ८२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४७ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ८७ हजार ५९३ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ३३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.