देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवार) शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या ३० फेऱ्यानंतर निवडणुकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल कॉग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे ४१ हजार ९३३ मताच्या फरकाने विजयी झाले.

उमेदवार निहाय मतमोजणीत मिळालेले मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस १ लाख ८ हजार ८४०), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी  ६६ हजार ९०७) , उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी ११ हजार ३४८), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) ४६७),  प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी १५५), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) २१५), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष १४३), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष १८३), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष २७४), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष २४३), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष ४९६), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष ४८६), नोटा (वरीलपैकी कोणीही) नाही (१ हजार १०३) , रद्द झालेले मतदान ३० आहे, असे एकुण १ लाख ९० हजार ८९० एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणूकीसाठी एकुण १५० अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.

भाजपाच्या हुकुमशाहीवृत्तीला जनतेची मोठी चपराक – नाना पटोले

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय हा काँग्रेस पक्षावरचा जनतेच्या विश्वासाचे प्रतिक आहे. हा विजय महाविकास आघाडी सरकारवरच्या कामाला जनतेने दिलेली पोचपावती आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप यांच्यासह स्थानिक जनता व काँग्रेस कार्यकर्त्यांचे या विजयाबद्दल मनापासूनच धन्यवाद. ” , अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पोटनिवडणुकांच्या निकालावर बोलताना पटोले म्हणाले की, “ देगलूरची जागा काँग्रेस पक्षाचीच होती पोटनिवडणुकीत ही जागा अधिक मताधिक्क्याने कायम राखली. विरोधीपक्ष भाजपाला या मतदारसंघात उमेदवारही मिळाला नाही, त्यांनी नेहमीप्रमाणे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बळजबरीने उभा केला, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. महाविकास आघाडी सरकार या निकालाने अधिक सक्षम झाले आहे. दोन वर्षात मविआ सरकारने केलेल्या कामाची ही पोचपावती असून, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपा व त्यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता कंटाळलेली आहे हेच यावरून दिसते. देगलूरच्या जनतेने ‘तथाकथीत लाट’ वा ‘पॅटर्न’ चालत नाही हे दाखवून दिले.”