Earthquake in Maharashtra Parbhani Hingoli Nanded Tremors: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वर्ल्ड इक्यू लोकेटर या एक्स हँडलवर भूकंपाच्या केंद्राची माहिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत येथे भूकंपाचे केंद्र असून सकाळी ८:४५ वाजता ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे वर्ल्ड इक्यू लोकेटरने म्हटले आहे. तसेच भूकंपाच्या केंद्राची खोली सुमारे १० किमी असल्याचेही नमूद केले आहे.
भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे प्राथमिक निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. ही नोंद लातूर इथल्या भूकंप मापन केंद्रावर झाली.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले.
मराठवाड्यातील जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही ठिकाणी नागरिकांमध्ये घबराट पसरल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याची सूचना केली आहे.

लातूरच्या विनाशकारी भूकंपाची आठवण
मराठवाड्यात जेव्हा जेव्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. तेव्हा लातूर जिल्ह्यातील भूकंपाची आठवण होते. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी लातूरच्या किल्लारी येथे प्रचंड विनाशकारी भूकंप झाला होता. रिश्टर श्रेणीनुसार त्याची तीव्रता ६.४२ होती. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी गावाच्या र्नैऋत्येला ४० किमी अंतरावर होता; आणि त्याची नाभी १० किमी खोल होती. लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांना या भूकंपाची झळ चांगलीच बसली होती.
लातूर जिल्ह्यातल्या ८१७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३२७ खेड्यांवर या भूकंपाचा विपरीत परिणाम झाला. यांमधली ५२ खेडी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. जवळपास ११ हजार लोक मृत्युमुखी पडले होते आणि ३० हजारांहून अधिक जखमी झाले होते. इथे मातीमध्ये दगड रचून केलेली कच्ची घरे होती. त्यातून भूकंप ऐन पावसाळ्यात आणि तोही मध्यरात्री लोक झोपेत असताना झाला. त्यामुळे भूकंपात घरे कोसळून प्रचंड जीवितहानी झाली.
उत्तराखंडमध्येही भूकंप
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. पहाटे ५:०२ वाजता ३.६ रिश्टर स्केलचे सौम्य धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाचे केंद्र रुद्रप्रयागपासून सुमारे १० किमी अंतरावर होते. तसेच त्याची खोलीही १० किमी असल्याचे सांगितले जाते. १० ते १५ सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.
