१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली –
– छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
– यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
– सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
– करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
– महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
– फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
– आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ
एकीकडे लसीकरणाची तयारी सुरु असताना राज्यात बुधवारी २४ तासात ३४५१ नवे करोना रुग्ण सापडले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

“राज्यात गेल्या २४ तासात ३४५१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झालं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.