वाई : महाबळेश्वर तालुक्यातील मांघरला आता ‘मधाचे गाव’ अशी ओळख मिळाल्यामुळे मध उत्पादनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी व्यक्त केला. केवळ मधमाशा पालनावर जगणाऱ्या या गावाला राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सोमवारपासून ही नवी ओळख बहाल करण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर या गावात मोठय़ा प्रमाणावर मधमाशांचे पालन होत़े त्यातून मोठय़ा प्रमाणात मध उत्पादन होत़े महाबळेश्वर येथील भिलारला साकारलेल्या ‘पुस्तकांचे गाव’च्या धर्तीवर येथे ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्याचा विचार पुढे आला. एकटय़ा मध उत्पादनातून या परिसराचा झालेला विकास पाहून या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी याचा पाठपुरावा केल्यावर सोमवारी या योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी देसाई म्हणाले, ‘‘निसर्ग साखळीत मधमाशांची मोठी भूमिका आहे. या मधमाशा पालनातून मध उत्पादन करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. या नव्या ‘मधाचे गाव’ योजनेतून मध उत्पादनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल. अशा प्रकारची गावे प्रत्येक जिल्ह्यात लवकरच स्थापन करण्यात येतील़’’ या उपक्रमाअंतर्गत गावात मधमाशांच्या वाढीला प्रोत्साहन दिले जाईल़ यामुळे महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना व राज्यभरातील ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार मध मिळू शकेल. या गावात मधमाशांचे संरक्षण व संवर्धन याबरोबरच डोंगराळ व जंगली भागांत राहणाऱ्या ग्रामस्थांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करणारा हा उपक्रम आहे, असे खादी ग्रामोद्योग संचालक वसंत पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप म्हणाले. या कार्यक्रमावेळी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिंन्हा, उप मुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, प्रांताधिकारी संगिता चौगुले राजापूरकर, मध संचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सरपंच यशोदा संजय जाधव आदी उपस्थित होते. मधाळ मांघर गाव मांघरमधील ८५ टक्के ग्रामस्थ १९४८ पासून शेतीला जोडधंदा म्हणून मध उत्पादन करतात. या गावातील शेती अथवा जंगलात लावलेल्या तीन हजार आठशे मधपेटय़ांद्वारे मध संकलन केले जाते. यासाठी खादी ग्रामोद्योग आणि कृषी विभाग सहकार्य करते. राज्यात सर्वाधिक मधाचे उत्पादन हे महाबळेश्वर परिसरात होते. त्यातील वीस टक्के मध उत्पादन हे एकटय़ा मांघर गावात होते. महाबळेश्वर तालुक्यातील मध येथील मधुसागर मधोत्पादन सहकारी संस्थेस विकला जातो. या संस्थेकडून दरवर्षी ३६ हजार किलो शुद्ध मध संकलित केली जातो.