चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे असं सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. पूर्व लडाखमध्ये सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. चीनमधील गोष्टींवर बंदी आणली जावी अशी मागणी केली जात असून अनेकांनी मोहीम सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही यानंतर चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आल्याचं वृत्त होतं. पण सुभाष देसाई यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

“हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत,” अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. “हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- “माझ्याकडे असलेली ‘ती’ पत्रं छापणार”, सामना अग्रलेखानंतर नितेश राणे यांचा शिवसेनला इशारा

“हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, एक हजार कोटी आणि 3 हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल,” असं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.