राज्यातील (Maharashtra) करोना(Coronavirus) महामारीचा प्रादुर्भाव पाहून ठाकरे सरकारनं दिवाळीसाठी नियमावली जारी केली आहे. राज्यात करोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे खबरदारी घेत सरकारकडून नियमाली जारी करण्यात आली आहे. करोनाच्या परिस्थितीत आतापर्यंत जसं इतर सण- उत्सव साध्या पद्धतीनं साजरे केले तसेच दिवाळीचा सणही साध्या पद्धतीनं साजरा करावा असं आवाहनही यावेळी सरकारकडून करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानेच राज्य सरकारकडून पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं व लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिवाळी उत्सवही करोनाच्या काळात साजरा केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खरबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करावा.

कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात यावी.

उत्सव कालावधीत नागरिकांनी विळेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी करण्याचेही टाळावे.

मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

दिवाळी हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिवाळी उत्सवानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतात. करोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नाहरिकांनी चालू वर्षी पटाके फोडण्याचे टाळावे. त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरस मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.

या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकराचे सार्वजनिक उपक्रम किंवा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करावं.

सांस्कृतीक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे करोना, मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र, त्या ठिकाणीदेखील लोकांनी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये. याची दक्षता घेण्यात यावी.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैदकीय शिक्षण विभाग तसेच संबधित महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रसाशन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.