एटापल्ली तालुक्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलेल्या गडचिरोली सी ६० पथकाच्या जवनांचे व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज दुपारी एक वाजताच्या सुमारास गडचिरोलीत दाखल झाले. एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रातंर्गत पयडीच्या जंगलामध्ये नक्षलांसोबत झालेल्या मोठ्या चकमकीमध्ये कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार करण्यात यश मिळविले. जवानांनच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील येत आहे. त्यांचे समवेत राज्याचे पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक हे देखील राहण्याची शक्यता आहे. गृहमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचा हा पहीलाच गडचिरोली दौरा आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितलं. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत ही माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल असं ते म्हणाले.

कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बेठक सुरू होती अशी माहिती आहे. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान आज सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.