महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE)बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. करोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला आहे. पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नाही.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. जुलैअखेर इयत्ता १२ वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक कामे थांबली आहेत. यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.

Maharashtra HSC Result 2021 : बारावीच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी; असा पाहा आपला बैठक क्रमांक

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द केली. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाने काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर सीआयएससीईने दहावी-बारावीचा आणि सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य मंडळ बारावीचा निकाल कधी जाहीर करणार याची विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा आहे. राज्यातील महाविद्यालये-विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या निकालानंतरच सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर पदवी प्रवेशाची प्रक्रिया अवलंबून आहे.

राज्यातील पाऊस, पूरपरिस्थितीमुळे काही भागातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली. नैसर्गिक आपत्ती असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल. त्याबाबतची अधिकृत घोषणा राज्य मंडळाकडून केली जाईल असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी म्हटले आहे.

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला काय?

महाराष्ट्र सरकारने केरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला होता. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.

निकाल कसा लागणार

बारावीच्या निकालात इयत्ता दहावीच्या गुणांना ३० टक्के भारांश असेल. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. तर इयत्ता अकरावीचा ३० टक्के भारांश असणार आहे. इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण बारावीच्या निकालात देण्यात येणार आहेत. तर इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश असेल. बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.