Maharashtra News Live Updates, 03 June 2022 : राज्यात करोना पुन्हा डोके वर काढत असून, दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील १५ दिवस महत्त्वाचे असून, शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले. रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. भोंग्याविरोधातील आंदोलन अधिक व्यापक करताना आता त्याला जनआंदोलनाची जोड देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार भोंग्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या भागात भोंग्याचा त्रास होत असेल तर त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून किंवा नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना कळवा आणि या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन ठाकरे यांनी पत्राद्वारे जनतेला केले आहे. अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.