Maharashtra News Updates Today, 22 May : बारामतीच्या मंडळींनी आजवर सगळीकडचे पाणी पळवले. तरीही पुन्हा उजनीच्या पाण्यात ते वाटेकरी होत आहेत. या मंडळींना कितीही पाणी दिले तरी त्यांची तहान भागत नाही. सगळेच आम्हाला आणि आमच्याच ताटात पाहिजे आहे, अशी त्यांची जी वृत्ती आहे. ती उर्वरित महाराष्ट्राने कायम लक्षात ठेवावी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांमध्ये बैठक होणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला होता. “पवारांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली याचा आनंद आहे,” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली होती. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मला अशी कुठलीही आठवण आलेली नाही,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.