Maharashtra Latest News Live Updates, 6 february 2023 : कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड निवडणूक जाहीर झाली आहे. कसबा पेठ आणि चिंचवड निवडणुकीसाठी भाजपा आज ( ६ फेब्रुवारी ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर, काँग्रेसकडूनही कसबा पेठसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे. तर, महाविकास आघाडी निवडणूक लढण्यासाठी ठाम आहे.
दुसरीकडे सत्यजीत तांबे प्रकरणावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप आहेत. यासह महाराष्ट्र, देश-विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घेऊया…
Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह देशातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बाळासाहेब दाभेकर मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दाभेकर यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
ठाणे : राज्यातील शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणीची कामे करणे गरजेचे असून यामुळेच समृद्धी महामार्गाबरोबरच मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो आणि विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांचा फायदा नागरिकांबरोबरच बांधकाम क्षेत्राला होणार आहे. हे सरकार सर्वसामन्यांचे असल्याने अशाप्रकारचे जनहिताचे निर्णय घेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यातील मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केले.
विकासकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'रेरा' कायद्याबाबत आणि घरखरेदीबाबत ग्राहकांमध्ये म्हणावी तशी जागरूकता आलेली नाही. हीच परिस्थिती विकासकांच्याबाबतीतही आहे. या पार्श्वभूमीवर घरखरेदीदार आणि विकासकांच्या मनातील सर्व प्रश्नांचे निरसन व्हावे यासाठी आता महारेराने त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या एका अहवालात म्हटलं आहे. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अदाणी समूहाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय जीवन आयुर्विमा ( एलआयसी ) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांसमोर आंदोलन करण्यात आलं. पुण्यातही काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं गेलं. या आंदोलन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मागील दोन दिवसांपासून शहरातील गारठा वाढला असून पुढील काही दिवस शहरात सकाळी काही तास धुके आणि दिवसभर निरभ्र आकाश असेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शनिवारी शहरात १०.३ तर रविवारी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे रक्त आमच्यात आहे. त्यामुळे, आमचा विजय निश्चित होईल. अद्याप आम्ही दुःखातून सावरलेलो नाहीत. आई अश्विनी जगताप यांनी नेहमीच वडिलांना पडद्यामागे राहून पाठिंबा दिला. आज त्यांची उणीव भासते आहे. वडिलांवर जनतेने भरभरून प्रेम केले, तसेच आमच्यावर करा, असे भावनिक आवाहन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या रेणुसे (जगताप) यांनी केले आहे.
‘शिवसंवाद’ च्या पहिल्या टप्प्यात शिवसेनेतील फुटीनंतर ‘गद्दार’ हा शब्द रुजविल्यानंतर आता पुन्हा युवासेना नेते आदित्य ठाकरे नाशिक व मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांतील काही गावांमध्ये ते संवाद करणार आहेत. फुटीनंतर शिवसेनेविषयी वाढलेली सहानुभूती कायम ठेवणे, हे आता नेत्यांसमोरचे आव्हान आहे.
बांधकाम प्रकल्पात खोदलेल्या खड्ड्यातील खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन दगड लागल्याने बांधकाम मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. स्फोटात एक बांधकाम मजूर जखमी झाला. या प्रकरणी तिघांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वर्धेतील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत गेली पाच दिवस साहित्य रसिक आणि सारस्वतांच्या मेळा भरला होता. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य नगरी सजली आणि गजबजली होती. संमेलनात दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रम पार पडले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. त्या सभागृहात आल्या, त्यांनी अर्थसंकल्प वाचला आणि त्या जिंकल्यासुद्धा. देशाच्या इतिहासात कित्येक अर्थसंकल्प सादर झाले, पण प्रत्येक अर्थसंकल्पात काही तरी वेगळेपण किंवा रंजक गोष्टी घडतात. यावेळी फार काही घडले नाही.
शरद पवार यांनी पुढाकार घेऊन पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकलता दाखवत बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केले होते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.
अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे मंदिर २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होईल असं वक्तव्यही केलं. मात्र, आता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी याच अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठं विधान केलं आहे. “लोकसंख्येचं असंतुलन रोखलं नाही, तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका असेल,” असा इशारा तोगडीयांनी दिला. ते सोमवारी (६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये बोलत होते.
काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीच्या नावाचं ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं. या अकाऊंटवरून नियमितपणे ट्वीट्स केले जात होते. विशेष म्हणजे हे अकाऊंट खरं मानून काँग्रेस नेते बंटी पाटलांसह अनेकांनी त्या अकाऊंटला फॉलो केलं होतं. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांनीच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अफजलखान, शायिस्तेखानावर केलेल्या विधानावर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गट आणि भाजपाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. वाचा सविस्तर
राष्ट्रवादी ही मुगल आणि आदिलशहाप्रेमी झाली का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान महाराष्ट्रासह जगभरात केला जातो. त्याऐवजी राष्ट्रवादीकडून मुगल आणि आदिलशाहाचं समर्थन होत आहे. हे त्यांचे आदर्श आहेत का? याचा खुलासा शरद पवारांनी करावा, अशी मागणी भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी केली.
राष्ट्रवादी ही मुगल आणि आदिलशाहाप्रेमी झाली का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान महाराष्ट्रासह जगभरात केला जातो. त्याऐवजी राष्ट्रवादीकडून मुगल आणि आदिलशाहाचं समर्थन होत आहे. हे त्यांचे आदर्श आहेत का? याचा खुलासा शरद पवारांनी करावा, अशी मागणी भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी केली.
देवदर्शनाला जाताना ऑटोचालकाशी ओळख झाल्यानंतर त्याने विवाहित महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सलमान रहिम शेख (३२, गोबरवाही, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.
अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूरमध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी न्यायालयात केली होती. त्यानुसार आता न्यायालयाने ही मागणी मान्य करत मुंबईबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे.
नुकताच अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजय झाले. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव केला. दरम्यान, या पराभवावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रणजीत पाटील यांना नाव न घेता टोला लगावला आहे. अकोला येथे संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सविस्तर वाचा
मागील आठवड्या पासून डोंबिवली शहराच्या विविध भागात बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील किमती ऐवज चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. विविध ठिकाणच्या घरांमध्ये केलेल्या चोऱ्यांमधून चोरट्यांनी सुमारे १० लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम चोरुन नेली आहे.
न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत सरकारचा थेट हस्तक्षेप झाला, तर सरकारला अपेक्षित असलेली मंडळीच न्यायाधीश होतील. सरकार बदलले, त्याप्रमाणे न्यायाधीशांची यादी बदलेल. यामुळे स्वतंत्र असलेली न्याययंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांनी उपस्थित केला.
Nana Patole Reaction on Balasaheb Thorat Letter : नुकताच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात दुफळी माजली आहे. काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही याप्रकरणावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, थोरातांनी याप्रकरणी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवल्याचं सांगितलं जात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं आहे. मात्र, जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर फिरू न देण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चानं दिलं आहे. तसेच, आव्हाडांनी माफी मागावी या मागणीसाठी युवा मोर्चाने मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण, पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.
कसबा पेठ पोट निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने आज ( ६ फेब्रुवारी ) अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी, भाजपाने मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे. मात्र, याला टिळक यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांची अनुपस्थिती असल्याचं दिसून येत आहे.
एका शिक्षिकेचे शाळेत शिकवताना सहकारी शिक्षकासोबत सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे लग्न शक्य नसल्याचे लक्षात येताच शिक्षिकेेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गेल्या काही दिवसात देशभरात हिंदू संघटनांच्या वतीने राज्यातील अनेक शहरात मोर्चे काढले जात आहे. खरे तर धर्मांतरण आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांना मोर्चे काढण्याची गरज काय, त्यापेक्षा मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.
योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या योगाभ्यासामुळे प्रचलित आहेत. मात्र, त्यांच्या काही विधानांमुळे ते वादात आणि प्रसंगी अडचणीत सापडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘महिलांनी कपडे घातले नाही तर त्या जास्त सुंदर दिसतात’, असं विधान करून मोठा वाद निर्माण केला होता. हे विधान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच समोर केल्यामुळे या वादाला राजकीय किनारही होती. मात्र, हा वाद शमतो न शमतो तोच बाबा रामदेव यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. या विधानामुळे पुन्हा एकदा रामदेव बाबा अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात नुकतीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी पार पडल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, तर भाजपाने कोकणातील जागा जिंकली. निवडणूक निकालानंतर राजकीय टोलेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग येथील आंगणेवाडीतील सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत कोकणासाठी काहीच केले नाही. विकास प्रकल्प येऊ दिले नाही,म्हणून येथील तरुणांचे नुकसान झाले. आई भराडीमातेने आम्हाला कौल दिला आहे, तिच्या दर्शनासाठी आलोय. असं फडणवीस म्हणाले होते. यास आता शिवसेना(ठाकरे गट) प्रत्युत्तर दिले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली. भगवद्गीता व अन्य धर्मग्रथांनी समाजाला सत्य सांगितले. पण, आपण भेदाभेद निर्माण करून सत्याचे अनुसंधान केलं नाही. समाज विखुरला गेल्याने परकीय आक्रमकांनी त्याचा लाभ घेतला, असे मत भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
आपणास काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचं षडयंत्र रचलं गेलं, असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला. युवक काँग्रेस प्रदेशाध्यपदाची कारकीर्द संपल्यापासून आपण संघटनेत काम करण्याची संधी मागत होतो, पण तसे घडलं नाही, असेही सत्यजीत तांबेंनी म्हटलं. यावर आता माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर…