Maharashtra Breaking News, 10 March 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याशिवाय बुधवारी संध्याकाळी मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी केलेल्या राजकीय टोलेबाजीवरूनही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत असून त्याचे पडसाद अधिवेशनातही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. सविस्तर वाचा
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या गोरेगाव चित्रनगरीतील सेटला शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. चित्रनगरीतील एका मोठ्या स्टुडिओत तळमजल्याला ही आग लागली. या आगीत मालिकेचे सगळे सामान जळून खाक झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन अस्तित्वात आलेल्या अधिसभेची पहिली सभा शनिवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे.
परगावी निघालेल्या प्रवाशांना सोडण्याच्या बहाण्याने त्यांना लुटणाऱ्या चोरट्यांना विशेष न्यायाधीस एस. एम. नावंदर यांनी सात वर्ष सक्तमजुरी आणि १५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. मावळ), मयूर दिलीप राऊत (वय २८) अशी शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. सविस्तर वाचा…
तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील ८ हजार ३०० भूखंडाची मोजणी प्रक्रिया केली जाईल. आगामी एक वर्षांत संबंधित जागा मालकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत केली. सविस्तर वाचा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीला बळ मिळावे यासाठी मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरु असतानाच, मनोरुग्णालयाची अत्याधुनिक पद्धतीने पुर्नबांधणी करण्यास राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिक्कामोर्तब केल्याने नवीन स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी होणार आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस जोडी ही धनाजी- संताजीची जोडी असून दोघेही दमदार काम करत आहे. त्यामुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या उद्धव ठाकरे यांनी आम्हाला काही सांगू नये अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसलं. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांकडून पक्षांतर्गत गटबाजीचीही चर्चा रंगली. आता या गटबाजीनंतर थेट दिल्लीतून पक्षांतर्गत फेरबदलाच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे. तसेच पटोलेंचं प्रदेशाध्यपदही जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी शुक्रवारी (१० मार्च) आपली भूमिका स्पष्ट केली.
शासकीय धान्य गोदाम, शासकीय वखार महामंडळ तसेच धुळे-नंदुरबार जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ या ठिकाणच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, बाहेरच्या कामगारांना काम देऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी कामगारांनी येथे निदर्शने केली.
शहरातील बारा पत्थर चौकात कोयता गळ्याला लावून तरुणाच्या खिशातील भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम हिसकावून नेणाऱ्या दोन जणांना ताबडतोब अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले.
ब्रम्हपुरी शहरामधील नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणींची छेड काढणाऱ्या एका मजनूला एका तरुणीने धाडस दाखवत पोलिसांच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. लगेच ब्रह्मपुरी पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधत काही तासांतच मजनूला पकडून गजाआड केले.
नागालँडमध्ये कोणताच पक्ष सत्तेबाहेर राहिलेला नाहीये. सगळेच पक्ष सत्तेत आले आहेत. नागालँडमधले मुख्यमंत्री भाजपाचे नाहीत. आमच्या सात लोकांनी त्यांना सांगितलं की आम्ही भाजपासह जाणार नाही. पण ऐक्याच्या दृष्टीने काही करायचं असेल, तर आम्ही नकारात्मक पाऊल उचलणार नाही. आमचं सहकार्य असेल, असं धोरण तिथे घेतलेलं आहे. – शरद पवार
जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही आणि वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासन ढिम्म असल्याने अखेर वृद्ध कलावंतांनी आज प्रेतयात्रा आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी 'प्रेत' ताब्यात घेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. सविस्तर वाचा…
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. साईनाथ नरोटे (२६) असे मृत युवकाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर या नक्षलग्रस्त गावातील रहिवासी होता. सविस्तर वाचा…
आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते यात दुमत नाही. मग आई ही हिंस्त्र श्वापदाची असो किंवा माणसाची. निश्चितच आईच आपल्या अपत्यासाठीचं प्रेम हे जीवापाड असतं याचं उदाहरण म्हणजे आर्वीलगतच्या दाहेगाव मुस्तफा येथील एका शेतात ऊस तोडणी सुरू असताना त्या ठिकाणी एका बिबट्याचा २५ दिवसांचा बछडा आढळून आला.
कारने विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या इसमास खामगाव येथील शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. या कारवाईत मदयसाठ्यासह चारचाकी देखील जप्त करण्यात आली.
मी किरीट सोमय्यांना बांधील नाही. किरीट सोमय्या हा दलाल आहे. मी तपास यंत्रणांना बांधील आहे. किरीट सोमय्यांनी आजवर अनेक आरोप माझ्यावर केले. पण एकही आरोप ते सिद्ध करू शकलेले नाहीत. म्हाडाच्या बाबतीत त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप माझ्यावर केला होता. तिथेही म्हाडानं माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही असं लिहून दिलं होतं. या प्रकरणातही जेव्हा निकाल लागेल, तेव्हा किरीट सोमय्याला मी उत्तर देईन.
आम्ही पहिल्या दिवसापासून ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. तसं आम्ही सहकार्य केलं. ईडीनं विचारलं ते सगळं आम्ही सांगितलं. पण तरी आज पुन्हा सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं. खेडच्या सभेचे हे परिणाम आहेत का? हा प्रश्न आता उपस्थित होतो.
मला वाटतं की किरीट सोमय्यांच्या आदेशांवर ईडी चालतेय का? सदानंद कदम यांना काल ईडीनं समन्स दिलं होतं. काल त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालं आहे. त्यांनी याचे सगळे कागद ईडीच्या कार्यालयात जमा केले होते. १०-१५ दिवसांच्या विश्रांतीची गरज असल्याचं त्यांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. असं असूनही त्यांना आज ईडीनं सकाळी ताब्यात घेतलंय. पण किरीट सोमय्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. याचा अर्थ किरीट सोमय्यांच्या सांगण्यावर ईडी चालतेय का हा प्रश्न आहे – अनिल परब
अवैध सावकारी प्रकरणात कारवाईचा फास आवळणाऱ्या पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकच अवैध सावकाराच्या जाळ्यात फसल्याची घटना उजेडात आली. सविस्तर वाचा…
आर्णी तालुक्यातील दाभडी नजीक जंगलात मानवी अस्थी सापडल्याने एकच खळबळ उडाली. गुरूवारी दुपारी जंगलात मध गोळा करण्यासाठी गेलेल्या एका तरूणास एक बेवारस मोबाईल फोन सापडला. त्याने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलात शोध घेतला असता मानवी अस्थी, केस, मुलामुलीचे कपडे आदी वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली.
डोंबिवलीतील शिवसेनेचे दत्तनगर प्रभागाचे माजी नगरसेवक आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या रेट्यामुळे दत्तनगर मधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ९० अपात्र लाभार्थींना याच योजनेतील इंदिरानगर येथील घरात कायदे-नियम डावलून, पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकून घरे देण्याचा विषय मोरे यांनी रेटला होता.
जाहिरात केंद्र सरकार करो किंवा राज्य सरकार. पण त्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असावा. आमचं सरकार असताना असं म्हटलं गेलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो असायला हवा. पण आता तुम्ही शक्कल लढवली आहे की कुठल्यातरी कार्यक्रमातला एकत्र असलेला फोटो लावता. आमचं सरकार असताना तुम्हाला सांगता आलं नाही का की तुमच्या तिघांचा एकत्र फोटो लावा – अजित पवार
कसबा पोटनिवडणूक आणि त्यापूर्वी नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर मतदासंघात विजय प्राप्त केल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिसभा निवडणूकही आघाडीने एकजुटीने लढण्याचे ठरवले खरे पण खुल्या प्रवर्गातील पाच जणांवर कोणी लढावे याबाबत एकमत न होऊ शकल्याने पाच जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सविस्तर वाचा…
विकासाच्या नावाखाली मुंबईतील आरे जंगल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आदिवासी पाड्यांतील झाडांची मोठया प्रमाणावर कत्तल केली जात आहे. जंगल नष्ट केले जात आहे. पर्यावरणाचे रक्षक असलेल्या आदिवासी बांधवांना विस्थापित करण्याचा घाट घालण्यात आला असून त्यांचे मूलभूत मानवी हक्क नाकारले जात आहे . सविस्तर वाचा…
पुण्यातील एका महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. यानंतर आता या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
सामान्य माणसाकडून दोन थोबाडीत खायला बच्चू कडू तयार आहे. पण नेत्याकडून अजिबात नाही. कट जाएंगे. ज्यांनी खोक्यांचा नारा काढला, ते काय बिगर खोक्याचे आहेत का? नागालँडमध्ये काय पेरणी-कापणी करायला गेले होते का? तिथे काय ऊस लावला होता का? – बच्चू कडू
आम्ही सामान्य माणसाशी गद्दारी केलेली नाही. आम्ही कुणी गद्दार नाही. माझा स्वत:चा पक्ष, माझी स्वत:ची पानटपरी आहे. आम्हाला शिवसेना, काँग्रेस, भाजपावाल्यांनी निवडून दिलेलं नाही. आम्हाला सामान्य माणसानं निवडून दिलेलं आहे. बच्चू कडूची गद्दारी पक्षाशी असू शकते, सामान्य माणसाशी आम्ही गद्दारी करत नाही – बच्चू कडू
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि समाजातील विविध घटकांचा विचार करून अर्थसंकल्प मांडला. मात्र अर्थसंकल्पात राज्य परिवहन महामंडळाला विशेष काहीच मिळाले नसून लाल परीची झोळी रिकामीच राहिली आहे.
शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान आणि एक रुपयांमध्ये पीक विमा योजना या शेतकऱ्यांच्या हिताच्या दोन योजनांमुळे आगामी निवडणुकांमध्ये ग्रामीण भागात भाजपला फायदा होऊ शकतो. या दोन योजनांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटातही काहीसे चिंतेचे वातावरण होते.
विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या कोणत्या बाजूने अध्यक्षांनी यावं, यावर भास्कर जाधवांनी मांडला मुद्दा. भर विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लक्षात आणून दिली चूक.
मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने उडवल्याची घटना समोर आली असून त्या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पाच मार्च रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे. अपघात अत्यंत भीषण होता, सुदैवाने यात डॉक्टर असलेले बळीराम बाबा गाढवे वय- ४७ रा. केशव नगर चिंचवड हे बचावले आहेत.
कोणत्याही सरकारने जातीची अटक घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही – सुधीर मुनगंटीवार
सांगलीतल्या प्रकारावरून अजित पवारांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली आहे. खतांची खरेदी करताना सांगलीत शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. मशीनमध्ये जातीचा रकाना भरल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाहीये. याप्रकरणी सरकारने तातडीने पावलं उचलावीत. यामध्ये कोण मुद्दाम गडबड करतोय, त्याचा आढावा सरकारने घ्यावा – अजित पवार
सरकारमध्ये एक असे मंत्री आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला शिव्या दिल्या आहेत. तरी ते मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा विषय महत्त्वाचा ठरला आहे – आदित्य ठाकरे
देशात विरोधी पक्षात बसलेला किंवा सत्याच्या बाजूने बोलतो त्यांच्यावर अशा कारवाया होत असतात. इथे कुठेही घाबरण्याचं काहीही कारण नाही. कारण ही भीती सरकारच्या मनात आहे. देशात राजकीय स्वातंत्र्य आणि लोकशाही जिवंत आहे का? – आदित्य ठाकरे
आपली जात किंवा धर्म हिंदुस्थानी म्हणून लिहिलं तरी त्यात काहीही गैर नाही – आदित्य ठाकरे
पक्षचिन्ह आणि नावासाठी ठाकरे गटासमोर संघर्षाची स्थिती उद्भवली असताना गेल्या आठवड्यात शिवगर्जना अभियानाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला नवसंजीवनी देण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर विरोधकांनी या प्रकारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचं म्हणत निषेध केला. तसेच यामुळे समाजात जातीभेद वाढेल, असा इशारा दिला. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड आहे. आगामी एप्रिल अखेरपर्यंत महत्वाच्या गाड्यांचे आरक्षण ‘ फुल्ल ‘ झाल्याची माहिती असून नागपूर- पुणे हा मार्ग अत्यंत व्यस्त असल्याची आकडेवारी आहे.
शिवाजी पार्कवर शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राज ठाकरेंनी सहकुटुंब उपस्थिती लावली होती. यावेळी राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
हा तपास यंत्रणांच्या कामकाजाचा भाग आहे. त्या चौकशी करून त्यासंदर्भात निर्णय घेतील – शंभुराज देसाई
साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जणार आहे.
संजय राऊत म्हणतात, “कोण काय म्हणतं त्यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा. शिवसेनेनं नेहमी…!”
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. हे सरकार कोसळण्याच्या भितीनेच शिंदे-फडणवीसांनी अनेक घोषणांचा समावेश असणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच घोषणा केल्या, पण निधी कुठं आहे? असा सवालही केला. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
हुचर्चित बारावी गणित पेपर फूटप्रकरणी साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) पोलिसांनी गुरुवारी आणखी एका युवकाला अटक केली. यामुळे आता आरोपीची संख्या आठ झाली आहे. दानिश खान फिरोज खान (२१, रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा) यास पोलिसांनी गुरुवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कबुतरांच्या पिसांसह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्युमोनिया’चा (एचपी) आजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कबुतरांना उघड्यावर खाद्यपदार्थ टाकू नका असे आवाहन केले आहे. तसेच खाद्यपदार्थ टाकताना आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे. यासंदर्भात पालिकेने शहरभर लावलेल्या फलकांमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणे बंदी योग्य आहे का, कायदा काय सांगतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
खामगावातील या घटनेने सामान्यजनच काय पोलिसही सुद्धा चक्रावून गेले. सोळा वर्षीय मुलीचे परिसरातील १८ वर्षीय मुलासोबत प्रेम जुळले. याची कुणकुण लागताच पालकांनी तडकाफडकी दूरवरच्या रत्नागिरी येथील युवकासोबत लग्न ठरविले. तारीख ठरली, लग्नपत्रिका वाटल्या, नातेवाईक जमले. महिला दिनाच्या मुहूर्तावर हळद लागली.
समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने महामार्ग चिंतेचा विषय बनला आहे. सोमवार २ मार्च रोजी ईरळा परिसरात एका चहा विक्रेत्याचा ट्रॅक अपघातात मृत्यू झाला होता. तर ६ मार्च रोजी औरंगाबाद कडून नागपूरकडे जात असलेल्या फॉर्च्यूनर गाडीचा भीषण अपघात झाला होता.
महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर