Mumbai News Today : नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ही हवाई पाहणी होती. तसंच शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. हिंदू आणि मुस्लिम समाजांत तेढ निर्माण केली जाते आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लव्ह जिहादसारख्या फाजील गोष्टींपेक्षा अनेक महत्त्वाच्या समस्या आणि प्रश्न देशात आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही. यासह विविध घटना राज्यात घडत आहेत.




Maharashtra Live News Today | ‘देशात मोदीविरोधी वातावरण’ या पवारांच्या वक्तव्याची फडणवीसांकडून खिल्ली आणि महत्त्वाच्या घडामोडी
ठाणे: मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साकेत आणि खारेगाव पूलाच्या दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) आठवड्याभरापूर्वी पूर्ण झाले आहे.
ठाणे – ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षाही कमी कालावधीत ६६ दिवसांत २०० कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार ७ जून रोजी सकाळी ६ वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
नागपूर : अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हे कोण करीत आहे तपासून बघावे लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुंबई : दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेदरम्यान पावसाळ्यात उद्धभवणाऱ्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) सज्ज झाले आहे. पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी एमएमएमओसीएलने पावसाळी नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
नागपूर : महाराष्ट्रात कटकारस्थान करून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? असा सवाल कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे.
डोंबिवली: येथील पूर्व भागातील ग प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांवर विशेष मोहिमेंतर्गत सोमवारी आक्रमक कारवाई करण्यात आली. सोमवार बाजाराचा दिवस असल्याने ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाने ग प्रभाग हद्दीतील एकाही रस्त्यावर फेरीवाला बसता कामा नये असे नियोजन केले होते.
प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘वनरक्षक गट-क’ च्या २१३८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उत्तीर्ण झालेला उमेदवार यासाठी पात्र ठरणार आहे. इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात आल्याने अनेकांना संधी मिळणार आहे. यासाठी १० जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून ३० जूनपर्यंत अर्जाची शेवटची तारीख आहे.
अकोला : मूळची अकोल्यातील रहिवासी अठरा वर्षीय तरुणीवर अत्याचार करून सुरक्षारक्षकाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात घडली. या प्रकरणातील आरोपीनेदेखील आत्महत्या केली. ५ जूनला परीक्षा झाल्याने ती तरुणी ८ जून रोजी अकोल्यात परतणार होती. मात्र, ६ जून रोजीच हा अनर्थ घडला.
नागपूर : भ्रमनध्वनी वापरणाऱ्यांना सातत्याने अधून-मधून विविध देवी-देवतांचे संदेश येतात. २० लोकांना संदेश पाठवा आपल्या मनोकामणा पूर्ण होईल, असे त्यात नमुद केले असते. सध्या गजानन महाराजांशी संबंधित असाच संदेश फिरत आहे.
नागपूर : माहेरच्या लोकांविषयी आणि घरातील काम करण्यावरून वारंवार सुनेला टोमणे मारणाऱ्या सासूचा सुनेने कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. ही थरारक घटना भिवापूर तालुक्यातील झिलबोडी गावात घडली. हिराबाई सिद्धार्थ पाटील (४५, झिलबोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सून रक्षंदा पाटील (२२) हिला अटक केली.
देवरीतील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर गेल्या ३० मे पासून सुरू असलेले वनहक्क धारकांचे उपोषण आज मागे घेण्यात आले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके आज बुधवारी उपोषणात सहभागी झाले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि वनाधिकाऱ्यांना देवरीत बोलावून घेत वनहक्कधारकांसह चर्चा केली.
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील १८ प्रभाग क्षेत्रात ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारती आहेत. या इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचे संरचनात्मक परीक्षण येत्या १५ दिवसाच्या कालावधीत करुन घ्यावे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिला आहे.
शहरातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी पोलिसांमार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध वा अवैध धंद्यांवर शक्यतो रात्रीच्या वेळी कारवाई केली जाते. अनेकदा गुन्हेगार रात्री घरी सापडत नाहीत. ह लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिवसा शोध मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्याची संकल्पना मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज्यातही महाविकासआघाडीकडून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका होते. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या ९ वर्षांच्या कालखंडात मंत्रिमंडळातील कोणता नेता आवडतो असा प्रश्न विचारला. यानंतर शरद पवारांनी मोदी सरकारमधील आवडत्या नेत्याचं नाव सांगत कारणंही नमूद केली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील परिस्थिती पाहता ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाला धोका निर्माण झाल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यानंतर पत्रकारांनी शरद पवारांना असं वक्तव्य का केलं? त्यामागची कारणं काय? असा प्रश्न केला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील काही भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यात मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर या भाजपा नेत्यांचा समावेश आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांवर भाजपा नेत्यांनी एकेरी टीका करूनही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शांत असल्यावरून नाराजी व्यक्त केली. आता स्वतः शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाणे शहरातील बहुचर्चित समूह विकास योजनेचा (क्ल्स्टर) शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. मुख्यमंत्र्यांनी ज्या भागातून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली त्या वागळे इस्टेट परिसरातील किसननगर भागात या योजनेची पायाभरणी केली जाणार आहे. वरवर पाहता हा प्रकल्प ठाण्यात आणि तोही मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यापुरता मर्यादित दिसत असला तरी त्याचे राजकीय परिणाम मुंबईसह महानगर पट्ट्यातील प्रमुख शहरांमध्येही दिसू शकतात याची जाणीव मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या निकटवर्तीयांना आहे.
मुंबई : ‘माथेरानची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेली ‘मिनी टॉय ट्रेन’ पर्यटकांचे खास आकर्षण आहे. मात्र पावसाळ्यात नेरळ आणि अमन लॉजदरम्यानची प्रवासी सेवा खंडित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येईल. या दरम्यान माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहतील.
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विक्री घटकावर स्थगिती, तसेच योजनेतून काढून टाकण्याचा इशारा देऊनही विकासक झोपडीवासियांचे थकविलेले भाडे देत नाही हे पाहून, विकासकाला संबंधित योजनेत कुठल्याही परवानग्या न देण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अशा विकासकांनी नवीन योजना सादर केली तरी त्यास मंजुरी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नागपूर : जो तो उठतो आणि राष्ट्रीय नेता बनतो. समाजातील प्रत्येक नेत्याला अखिल भारतीय नेता बनायचे असते. त्यामुळे आपले पक्ष, संघटना एकसंघ राहत नाहीत. आंबेडकरी समाजाला फुटीचा शाप आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री व भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे राखीवसाठा वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता पाणीसाठा वाढला आहे. सध्या सातही धरणांत ११ टक्के पाणीसाठा असला तरी राखीवसाठा धरून १८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मुंबई : रुग्णालयामध्ये हिमोफिलियावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विविध चाचण्यांसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये फिरावे लागते. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेत केईएम रुग्णालय हिमोफिलियाच्या रुग्णांना एकाच छताखाली, एकाच ठिकाणी उपचार आणि निदान उपलब्ध करून देत आहे.
वर्धा : तीन तासांपूर्वी लागलेली आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून बुटीबोरी व अन्य ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहे. भंगार गोदामास लागलेल्या आगीने चांगलाच वणवा पेटला. लगतच्या एका उद्योगाने पेट घेतला. मात्र अन्य सहा उद्योगास सुरक्षित ठेवण्यास यश आले.
हे सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम गृहविभागाचं आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिक बोलतोय. गृहमंत्री स्वत: त्या अधिकाऱ्यांशी बोलतायत. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. अशा व्यक्तीला पाठिशी घातलं जाणार नाही. सगळ्या नागरिकांना मी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करतो.
श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या सात विश्वस्तांची निवड ही धमार्दाय आयुक्त पुणे यांनी नियमानुसारच केल्याची माहिती ‘श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष पोपटराव खोमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
धुळे: शहरातील मोगलाई भागात एका प्रार्थनास्थळाची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अधीक्षक संजय बारकुंड यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
धुळे: शहरातील मोगलाई भागात एका प्रार्थनास्थळाची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून अधीक्षक संजय बारकुंड यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर: मोबाईलच्या स्टेटसवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद होते. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनाने शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
चंद्रपूर : भूखंड घेऊन विहित कालावधीत उद्योग सुरू न केल्याने जिल्ह्यातील १३ औद्योगिक वसाहतीतील १३० भूखंडधारकांना नोटिशी बजावण्यात आल्या आहे. यातील २५ भूखंड एमआयडीसीने स्वतःकडे परत घेण्याची कारवाई केल्याने उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे.
औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा आता नितेश राणे यांनी दिला आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करायला हे काही महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
भंडारा – वरठी मार्गावरील जमनी येथे भंडारा नगरपालिकेचे डम्पिंग यार्ड आहे. येथे बांधकाम सुरू असून यासाठी चोरीची वीज वापरली जात असल्याचे गंभीर प्रकरण आज उघडकीस आले. महावितरणचे अधिकारी दुपारी डम्पिंग यार्ड मध्ये जेव्हा रीडिंग घ्यायला गेले तेव्हा त्यांना ही चोरीची बाब लक्षात आली.
जळगाव: वनविभागाच्या रावेर वनपरिक्षेत्रातील चोरवड सीमा तपासणी नाक्यावर मध्यरात्री विनापरवाना १८ हजारांचे वीस घनमीटर जळाऊ लाकूड व पाच लाख रुपये किमतीची मालमोटार, असा सुमारे पाच लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. मावळमधून तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी मागणी शहर पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी असताना महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
वर्धा जिल्ह्यातील नऊ महिन्यांच्या दुर्धर हृदयविकार असलेल्या बालकाला दूध पिताना दम लागून श्वास थांबत होता. न्यू ईरा मदर ॲन्ड चाईल्ड हाॅस्पिटलच्या बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. संदीप खानझोडे आणि डॉ. आनंद संचेती यांच्या चमूने गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने बालकाला जीवदान मिळाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज कुमार (३५) हा मूळचा जबलपूर-मध्यप्रदेशचा आहे. बेरोजगार असलेल्या मनोजने कामाच्या शोधात नागपूर गाठले. दोन दिवस फुटपाथवर दिवस काढल्यानंतर त्याने प्रदीप नावाच्या मित्राला फोन केला. त्याने मित्राला घरी नेले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यासाठी डिसेंबर २०२४ मुदत देण्यात आली आहे. मात्र विमानतळ उभारणीचा वेग पाहता हा प्रकल्प मुदती पूर्व मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव: पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील नशिराबाद येथे ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावात महिनाभरातून अवघे तीन वेळा तासभर पाणी मिळते.
दिवा परिसरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या फलकावरुन शिवसेनेने राज्यातील सत्तासहयोगी मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डोंबिवलीचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या छब्या गायब केल्याने येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वर्धा येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास एक तासापूर्वी भीषण आग लागली असून त्यावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहे. तूर्तास तीन अग्निशमन गाड्या आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या भांदारातून गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. वासिम यांचे हे गोदाम असल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यांना १० हजार ते २० हजार रुपये दरम्यानची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला ५० हजारापर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदु्त्त्वावादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. “शिंदे फडणवीस सरकारच्या काळात औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले कसे जातात?” असा सवाल विचारतच हे तुमच्या सरकारचे अपयश आहे, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आज संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी आक्रमक भूमिका घेऊन विरोधकांना लक्ष्य केलं आहे. “अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण फूस लावतंय याची चौकशी सुरू झाली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्याकरता गेले होते. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताचारी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आलाय. ठाकरे गटातील नेते मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर, शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु, तरीही राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्याने ठाकरे गटाने हल्लाबोल केला. तसंच, राज्यात रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बेंबळा प्रकल्पावरील अमृत योजनेच्या पाणी पुरवठ्यासाठी ३३ केव्हीचे एक्स्प्रेस फिडरच्या निविदा प्रक्रियेत बोगस कागदपत्र व अनुभव प्रमाणपत्र जोडून सात कोटींचा अपहार झाला होता. या प्रकरणात अधिकारी, कंत्राटदार आदींसह १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
अहमदनगरच्या उरुसमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुण नाचले. त्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. तसंच कोल्हापूरमध्ये याच घटनेचा निषेध नोंदवत हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
काॅंग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्याविरोधात काॅंग्रेसमधल्या एका गटाने वज्रमुठ बांधली आहे. काँग्रेस भोला भवनात साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रदेश नेतृत्वाचे लक्ष वेधले. प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे हे काल उपोषणस्थळी येऊन गेले. पुढील १० दिवसात तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
मालेगाव: धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा सलग तीन निवडणुकांमध्ये झालेला पराभव तसेच या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य लक्षात घेता आगामी लोकसभा निवडणुकीत धुळ्याची जागा काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढविण्यात यावी म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करून घरी परत जाणाऱ्या नांदुरा येथील शेतकऱ्याला पोटे कॉलेज मार्गावरील जकात नाका परिसरात अडून त्याच्यावर सामूहिक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी शेतकऱ्याजवळील रोख २ लाख ७१ हजार रुपयांसह हातातील अंगठी, सोनसाखळी, मोबाईल फोन हिसकावून घेतला.
शरद पवार यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला की लव्ह जिहादची प्रकरणं देशात वाढत आहेत अशी चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. कारण नसताना समाजा-समाजात तेढ वाढवतो. या सगळ्या गोष्टींसंबंधी मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये.”
देवेंद्र फडणवीस यांनी उडवली शरद पवारांच्या वक्तव्याची खिल्ली.
नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ही हवाई पाहणी होती. तसंच शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. हिंदू आणि मुस्लिम समाजांत तेढ निर्माण केली जाते आहे असं त्यांनी म्हटलं आहे.