Maharashtra Political News Today, 21 November 2023 : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर साखळी आंदोलन करत आहेत. त्यांच्या सभांना लाखो लोकांची गर्दी जमत आहे. दुसऱ्या बाजूला मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ओबीसी नेते विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष चालू आहे. आज दिवसभरात याविषयीच्या बातम्या पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी चीनच्या मकाऊमधल्या एका कसिनोमधील जुगाऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. यावर भारतीय जनता पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. राऊत आणि भाजपाच्या समाजमाध्यमावरील आरोप प्रत्यारोपांवरून या कथित फोटोत दिसणारी व्यक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोवरून ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरू झाला आहे. यावरही आज दिवसभरात राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळतील.




Maharashtra News Live Updates : मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर
बुलढाणा: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाला दिवाळीने मदतीचा मोठा हात दिला. केवळ ११ दिवासातच विभागाला तब्बल ५ कोटी ४४ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले.
नागपूर: रेल्वेने कुठेही प्रवास करतो म्हटले की, कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होते. पण दलालांकडे मात्र कन्फर्म तिकीट हमखास मिळते. असे कसे काय घडते? असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
चंद्रपूर: वेगळ्या विदर्भाबाबत अनोख्या आंदोलनामुळे प्रसिद्ध झालेल्या बाबाराव मस्की यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
यवतमाळ: शासनाने घोषित केलेल्या पीक विमा मदतीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चक्क दोन, पाच, दहा रुपयांची मदत देऊन विमा कंपन्या शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. असंख्य शेतकऱ्यांना अत्यल्प विमा परतावा मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट चांगलाच संतप्त झाला.
भंडारा: झाडीपट्टीत दिवाळीनंतर गावागावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. लोककलेचा वारसा असलेल्या या उत्सवात आता काही गावांमध्ये डान्स हंगामाचा धुमाकूळ सुरू झाला असून बाहेर राज्याहून आणलेल्या नृत्यांगनासोबत अश्लील नृत्य केले जात आहे.
कल्याण – कल्याण-डोंबिवली शहरात धुळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून धूळ प्रतिबंधक उपाययोजना करित नसलेल्या नवीन गृह प्रकल्प, पुनर्विकास गृहप्रकल्पांना कामे थांबविण्याच्या नोटिसा साहाय्यक आयुक्तांनी देण्यास सुरूवात केली.
पुणे : उपनगरात किरकोळ वादातून टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. टोळक्याने कोयते उगारून वारजे भागात दहशत माजवून १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी वारजे पाेलिसांनी सराईत गुन्हेगारांसह साथीदारांना अटक केली आहे.
जरांगे पाटील आंदोलन करीत असलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी लाठीमार केला होता.
बदलते वातावरण, अभयारण्य परिसरात अन्न पदार्थाची असणारी मुबलकता पाहता दोन ते तीन वर्षांपासून गायब असलेले पक्षी दिसू लागले आहेत.
वाशिम : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड आशीष फरार होतो. कारागृहात कैद्यांना फोन व सोई सुविधा मिळतात. गृहखात्याचा कारभार असलेले देवेंद्र फडणवीस ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अशा जिल्ह्यात चिमुकल्या मुली सुरक्षित नसल्याची बाब अत्यंत लाजीरवाणी असून गृहखाते सांभाळण्यात देवेंद्र फडणवीस सपशेल नापास ठरल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केला.
श्रद्धाळू, भक्त, सेवेकरी यांना अध्यात्माच्या नावाने फसवून, त्यांचे कोट्यवधी रुपयाचे शोषण करण्यात आल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे, असा दावाही अंनिसने केला आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे, असे मत मानवी हक्क संरक्षण संस्थेने व्यक्त केले.
नागपूर : नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मध्यवर्ती स्थानकानंतर प्रवाशांची सर्वाधिक पसंती रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्थानकाला मिळत आहे. नुकतीच दिवाळी संपली. या काळात बाहेरगावहून नागपूरला रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली होती. तसेच नागपूरहून बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांचीही गर्दी वाढली होती. या प्रवाशांनी त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा वापर केल्याचे दिसून आले आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी वेळोवेळी मांडली आहे.
येत्या ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, तेलंगणात काँग्रेस पक्षाचं बळ वाढलं आहे. दोन पक्षांनी आपली ताकद काँग्रेसच्या मागे उभी केली आहे. तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी डीएमके या पक्षाने तेलंगणा राज्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. वायएसआर तेलंगणा काँग्रेस या पक्षानेही याआधी डीएमके पक्षाप्रमाणेच भूमिका घेतली आहे.
जामनेर तालुक्यातील वाकोदसह इतरही गावांत पाणीप्रश्न बिकट झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे वाकोदमधील पाण्याचा प्रश्न अधिकच कठीण झाला आहे.
नागपूर : शहराला एज्युकेशन हब म्हणून स्थापित करण्यासाठी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ इकॉनामिक कौन्सिलने (वेद) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
परिसराला अतिक्रमणचा विळखा पडला असून चहुदिशेने होणारी वाहतूक अनेकदा ठप्प होते.
नागपूर : महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यांत जाण्यासाठी दिवसभरात अनेक रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. परंतु, राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचा फटका विद्यार्थी, युवक, व्यावसायिकांना बसत आहे.
नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
बोलण्याच्या ओघात अनावधानाने घडलेल्या या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमात पसरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे.
पुणे : शहर आणि परिसराच्या किमान तापमानात मागील दोन दिवसांपासून वाढ होत आहे. सोमवारी, शिवाजीनगर परिसरात १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. वडगाव शेरी येथे २२.८ अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत जास्त किमान तापमानाची नोंद झाली आहे.
ठाणे – मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला.
सविस्तर वाचा…
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामाेरे जावे लागते. निवासी डॉक्टरांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी, तसेच त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्य पातळीवर मानसिक आरोग्य निवारण समिती स्थापन करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) संचालकांना दिले आहेत.
पुणे : महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलमापक बसविण्यास शहरात विरोध होत आहे. मात्र, आता विरोध करणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
पुणे : यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे १०० टक्के भरली नाहीत. त्यामुळे सध्या पाणीसाठा ८९ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी २० नोव्हेंबरला चारही धरणांत मिळून ९५ टक्के पाणीसाठा होता. यंदा शहराला दोन महिने पुरेल एवढ्या पाण्याची तूट असल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदविले आहे. सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात नसली, तरी नव्या वर्षात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, खासगी बस कंपन्यांकडून आता अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली जात आहे.
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुणे पोलिसांनी तीन पानी गोपनीय अहवाल सोमवारी न्यायालयात दाखल केला. ललितसह साथीदारांचे परदेशातील बड्या अमली पदार्थ तस्करांशी संबंध असल्याचे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यातील नागरिकांनाही या संदर्भातील पुरावे, वंशावळी, शैक्षणिक, महसुली पुरावे, जुने अभिलेख, सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज प्रशासनाला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दावा केला होता की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणी आहे का? हे तपासावं लागेल. या आरक्षण प्रकरणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील सुव्यवस्थेचा भंग करायचा असं कोणी ठरवलं आहे का? निवडणुका तोंडावर असताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही. राज ठाकरे यांच्या या दाव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे. राज ठाकरे बरोबर बोलले. माझ्या पाठिशी मराठा समाजाची मोठी शक्ती आहे. त्यामुळे दुसरी कुठलीही शक्ती माझ्यासमोर टिकणार नाही.
मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी – न्हावशेवा सागरी सेतू) लोकार्पण २५ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपाने सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून केली. मात्र या सागरी सेतूचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण होईल. त्यामुळे सागरी सेतू डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता नसल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. गावित बोलत होते.
पिंपरी : अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या पाच उद्वाहक (लिफ्ट) मशिन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.
पुणे : जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः, तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यांत अंशतः दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुकेवगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत.
अंबरनाथः अंबरनाथ शहरातील जाहिरात फलक मुक्त आणि शहराच्या पूर्व भागातील कोंडी फोडण्यासाठी महत्वाचा ठरलेल्या पहिल्या बाह्यवळण रस्त्याची मोठी जाहिरात अंबरनाथ पालिकेच्या वतीने करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा महत्वाचा रस्ता अंधारात असल्याचे समोर आले आहे.
रात्री पावणे नऊच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातूनच फरार झाला.
ठाणे: महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) ताफ्यात प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या बसगाड्या असतानाच, आता वाहकांच्या कमतरतेमुळे शहरातील विविध मार्गावरील बसगाड्या २० ते ३० फेऱ्या रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
अब्दुल तेलगीने एका रात्रीत बारमध्ये १ कोटी रूपये उधळल्याची माहिती होती. पण, मकाऊमध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती कॅसिनोत साडेतीन कोटी डॉलर उधळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं अच्छे दिन आलेत, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं. राऊत यांनी कॅसिनोत जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याचं बोललं जात आहे. यावर भाजपानेही ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. भाजपाने ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा एका बॉलिवूड पार्टीतला फोटो शेअर केला आहे. यामध्ये आदित्य ठाकरे काहीतरी पित असल्याचं दिसत आहे. यावरून भाजपाने आदित्य ठाकरेंचा ब्रँड कोणता? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींचा जो ब्रँड आहे तोच ब्रँड आदित्य ठाकरे यांचाही आहे. आदित्य ठाकरे डाएट कोक पित होते. त्या फोटोतही तेच दिसतंय.
“भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी, कारण..”, संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका केली ती योग्यच आहे. मी मनोरुग्ण आहे कारण महाराष्ट्राच्या हिताचा विचार आम्ही करतो. त्यामुळे आम्ही मनोरुग्ण आहोतच. आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात घालण्याला विरोध करत आहोत. एका उद्योगपतीला मुंबई विकण्याला विरोध केल्यामुळे आम्ही मनोरुग्ण वाटत असू तर आम्ही आहोत मनोरुग्ण असंही संजय राऊत म्हणाले. तसंच मनोरुग्ण कोण आहे? ते लवकरच समजेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.