Maharashtra News Updates, 2 october 2022 : शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. ही चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर कुठे आहेत? असाही प्रश्न विचारला गेला. या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकरांनी यांनी एक ट्वीट केलं आहे. “मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.”, असे ते म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी, कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या अंगवळणी पडलेल्या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधन करावे लागणार आहे. ‘वंदेमातरम बोलण्याची सक्ती नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आग्रही आहेत. हा विषयही आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

यासह अन्य सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra News Updates, 2 october 2022 : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बातम्यांचा आढावा, एका क्लिकवर…

18:51 (IST) 2 Oct 2022
यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशातील ७५ टक्के जनता हलाखीचे जीवन जगत आहे. यासाठी आजी-माजी राज्य व केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून देशाची वाटचाल विनाशाकडे सुरू असल्याची टीका अर्थतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच.एम. देसरडा यांनी केली.

सविस्तर वाचा

17:52 (IST) 2 Oct 2022
खरगे हायकमांडचा पाठिंबा असलेले उमेदवार आहेत का? शशी थरूर म्हणाले, “मी राहुल-प्रियंका गांधींशी बोललो, त्यांनी…”

अनेक वर्षांनी काँग्रेसची पक्षांतर्गत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असणार आहेत. या निवडणुकीत खासदार मल्लिकार्जून खरगे आणि खासदार शशी थरूर आमनेसामने आहेत. अशातच खरगे पक्षश्रेष्ठींच्या जवळचे उमदेवार असल्याची आणि काँग्रेस पक्षाचा त्यांनाच पाठिंबा असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत शशी थरूर यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्ध्यातील सेवाग्राम येथे बापूकुटीत महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी चिंतामणी कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा…

17:16 (IST) 2 Oct 2022
चंद्रपूर : वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, अतिक्रमण काढण्यासाठी वनविभागाचा दबाव?

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी गंभीर असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जाग्यावर १९८४ पासून शेती करित आहेत.

सविस्तर वाचा

15:29 (IST) 2 Oct 2022
“देशात राहायचे असेल तर…”; ‘वंदे मातरम’च्या निर्णयावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

राज्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधावे, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ”देशात राहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल”, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा –

15:28 (IST) 2 Oct 2022
आग्रह धरला असता, तर चांगलं खातं मिळालं असतं- मंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ तालुक्यातील कंडारी, फुलगाव, कोठोरा व कठोरा बुद्रुक या चार गावाच्या १३ कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाबाबत महत्त्वाचं विधान केलं. ”मी जर एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरला असता, तर यापेक्षा चांगलं खातं मिळालं असतं”, असं ते म्हणाले. सविस्तर वाचा –

15:14 (IST) 2 Oct 2022
बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर उद्धव ठाकरे … – नारायण राणेंची घणाघाती टीका!

भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(रविवार) वर्धा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आणि शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित केले. याशिवाय शिवसेनचा मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसबाबतही राणेंनी यावेळी खोचक टिप्पणी केली. वाचा सविस्तर बातमी…

14:38 (IST) 2 Oct 2022
नागपूर : स्मार्ट सिटीच्या कामातून ‘शापूरजी’ला वगळले; कामात दिरंगाई भोवली

स्मार्टसिटीतंर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामात शापूरजी पालोनजी प्रा. लिमिटेड या कंपनीने कामात दिरंगाई आणि वेळकाढू धोरण अवलंबल्याने विकास कामातून या कंपनीला वगळण्यात आले आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठक झाली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला.

सविस्तर वाचा

14:16 (IST) 2 Oct 2022
शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे; आता मला काळजी एवढीच आहे की… – नारायण राणेंचं पत्रकारपरिषदेत विधान

वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज(रविवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे दाखल होत, शिंदे गटात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकरल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी ही काहीशी चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे. दसम्यान, या घटनेवर भाजपा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज वर्धा येथे पत्रकारपरिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी…

14:08 (IST) 2 Oct 2022
नागपूर : सांस्कृतिक महोत्सवाच्या ज्येष्ठ नागरिक महोत्सव घेणार; नितीन गडकरी यांची घोषणा

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांचा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गिरीश गांधी, माजी आमदार अनिल सोले, अशोक मानकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी,नंदा जिचकार, आदी उपस्थित होते.

सविस्तर वाचा

13:45 (IST) 2 Oct 2022
वर्धा : ‘‘पाण्याचा गांभीर्याने विचार करणारा एकमेव नेता..’’ जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार

७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोलताना डॉ. सिंह यांनी फडणवीसांच्या कामाची प्रशंसा केली. २०१४ मध्ये सत्तेवर येताच फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही देशातील पहिली कंत्राटदार मुक्त योजना राबविली, जलसाक्षरता वाढविली. त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट होते.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 2 Oct 2022
ठाणे : देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक; ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला होता. या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक लागला आहे. 

सविस्तर वाचा

13:06 (IST) 2 Oct 2022
कल्याणमध्ये मोहन अल्टिजा इमारतीत आग; दोन सदनिका जळून खाक, कोणतीही जीवित हानी नाही

कल्याण पश्चिमेतील वायलेनगर येथील मोहन अल्टिजा इमारतीच्या तिसऱ्या मळ्यावर रविवारी सकाळी सहा वाजता शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली. घरातील कुटुंबीय तात्काळ घरा बाहेर पडल्याने जीवित हानी झाली नाही. आगीत एका माळ्यावरील दोन सदनिका जळून खाक झाल्या. वायलेनगर भागात मोहन अल्टिजा इमारत आहे. पांडे यांच्या दोन सदनिका एकाच माळ्यावर आहेत.

सविस्तर वाचा

12:52 (IST) 2 Oct 2022
मुंबई : सर्वाधिक खड्ड्यांच्या यादीत मुंबई उपनगर अग्रेसर; या भागातून सर्वाधिक तक्रारी

या पावसाळ्यात मुंबईतील खड्ड्यांबाबत आलेल्या एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी पश्चिम उपनगरातून आल्या आहेत. यावर्षी पालिकेच्या रस्ते विभागाने एकूण ३४,३९२ खड्डे बुजवले असून त्यातील सर्वाधिक खड्डे हे अंधेरी ते मालाड परिसरातील आहेत. खड्ड्यावरून न्यायालयाने पालिकेला फटकरल्यानंतर पालिकेने खड्ड्याबाबतचा अहवाल तयार केला असून त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा

12:51 (IST) 2 Oct 2022
मुंबई विमानतळावरील इंडिगो विमान बॉम्बद्वारे उडवण्याच्या धमकीचा ईमेल

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई-अहमदाबाद या विमानाला उडवण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाल्यामुळे शनिवारी प्रशासन आणि पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी सर्व यंत्रणांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर तासभर विलंबाने म्हणजे रात्री ११ च्या सुमारास विमान अहमदाबादला रवाना झाले. वाचा सविस्तर बातमी…

12:43 (IST) 2 Oct 2022
”…तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाण्याची तयारीत होते”

शिवसेनेतील बंडखोरीमुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी दोघांमधील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत असताना आता शिवसेनेचे मुखपत्र असेलल्या सामनातील रोखठोक या सदरातून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली होती, असे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे. सविस्तर वाचा..

12:29 (IST) 2 Oct 2022
‘स्वाईन फ्लू’ मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्क्यांवर; २४ तासात २ रुग्णांची भर

जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के नोंदवण्यात आले. नवीन आढळलेले दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ३३२, ग्रामीण १०९, जिल्ह्याबाहेरील १८० अशी एकूण ६२१ रुग्णांवर पोहचली आहे.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 2 Oct 2022
नागपूर : काँग्रेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हावे; काँग्रेस नेते शशी थरूर यांची अपेक्षा

काँग्रेस पक्षात अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हायला हवे, अशी अपेक्षा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली. दीक्षाभूमी येथे भेट दिल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साथला. याप्रसंगी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख उपस्थित होते. थरूर पुढे म्हणाले, मी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी तिघांचीही भेट घेतली.

सविस्तर वाचा

12:13 (IST) 2 Oct 2022
नागपूर : अधिसंख्य कर्मचाऱ्यांची बाईक मिरवणूक गडकरींच्या निवासस्थानी; उपमुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार असल्याचे गडकरींचे आश्वासन

गडकरी यांनी या कर्मचाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान शनिवारी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. गजानन निखार व विजय पौनिकर या दोन उपोषणकर्त्यांना मेयो मध्ये दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 2 Oct 2022
काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेचे साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी… – आशिष शेलारांनी साधला निशाणा

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेतील भुकंपानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या मेळाव्यांमधून विरोधी गटांवर काय आणि कोणत्या प्रकारे आरोप केले जाणार याची सर्वांमध्ये चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:59 (IST) 2 Oct 2022
नवरात्रोत्सवात नारळांना मागणी; दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक

नवरात्रोत्सवात नव्या नारळाला मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक सध्या होत आहे. नवरात्रोत्सवात भाविकांकडून तोरण वाहिले जाते. तोरणासाठी नव्या नारळाचा वापर केला जातो. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून नारळाची आवक मार्केट यार्डातील भुसार बाजारात होते.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 2 Oct 2022
पुणे : पूल पाडताय की चीनची भिंत पासून ते बर्लिन वॉलपर्यंत…; चांदणी चौकातला पूल सोशल मिडियावर ट्रेंडिंग

चांदणी चौकातील पूल पाडणार असल्याची घोषणा सुरु झाल्यापासून सोशल मिडियावर गप्पा झाल्या नाहीत तरच नवल. फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सॲपसह सगळीकडेच शनिवारपासून पूल चर्चेत राहिला. हा पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनापासूनच या चर्चांना सुरुवात झाली. त्यातूनच – ‘मोजून ३० मीटरचा पूल पाडणार आहेत आणि आव असा आणलाय जणू काही चीनची भिंतच पाडायची आहे!’ हा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली.

सविस्तर वाचा

11:51 (IST) 2 Oct 2022
शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

दसरा मेळावा जवळ येत असताना, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा

11:39 (IST) 2 Oct 2022
अकोला : घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; अकोला जिल्ह्यातील पातूर येथील धक्कादायक प्रकार

घराच्या अंगणात चक्क अंमली पदार्थ असलेल्या  गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पातूर येथे समोर आला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली. गांजाची १५ झाडे जप्त करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा

11:30 (IST) 2 Oct 2022
दसरा मेळावा : “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…” ; बावनकुळेंचं विधान!

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेतील भुकंपानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या मेळाव्यांमधून विरोधी गटांवर काय आणि कोणत्या प्रकारे आरोप केले जाणार याची सर्वांमध्ये चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. वाचा सविस्तर बातमी…

10:53 (IST) 2 Oct 2022
‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात

शिवसेनेतील खासदार, आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. दोघांकडून टीझरही लॉंच करण्यात आले आहे. दरम्यान, आता यावरूनच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

10:51 (IST) 2 Oct 2022
अजित पवारांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन

विरोधी पक्षनेते अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर होत. आज सकाळी पुण्याच्या दिशेने जाताना महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांनी रेल्वेस्थानक परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.

दिल्ली येथील ट्विन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती. ती इमारत पडतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच कंपनी मार्फत पुण्यातील चांदणी चौकातील पुलास रविवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला. मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे एनएचएआय आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. तसेच या स्फोटाच्या यशस्वीतेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहेत. सोशल मीडियावर मीम्सद्वारे यावर निशाणा साधला जात आहे. १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही यावर अधिकारी आनंद शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.